कोल्हापूर(प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या शेतीमालाला हमीभाव हवा असेल तर शेतकर्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. तुमच्या घामाचे दाम हवे असतील तर मेघालयातील शेतकर्यांनी हमीभावाच्या लढाईसाठी मोठा लढा उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
हिल फार्मर युनियन या मेघालयातील शेतकर्यांच्या संघटनेचा आज तिसावा वर्धापन दिवस होता. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेतकर्यांच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी विशेष अतिथी म्हणून राजू शेट्टी व व्हीएम सिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. यावेळी शिलाँग, मेघालय येथील मुलकी ग्राऊंड घेण्यात आलेल्या सभेत राजू शेट्टी बोलत होते.
शिलाँग हे मेघालयची राजधानी आहे. शिलाँग हे देशातील सर्वाधिक पाऊस पडणार्या चेरापुंजीच्या जवळ आहे. त्यामुळे दि. 12 मे पासून याभागामध्ये प्रचंड पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. अशा परिस्थितीत हा कार्यक्रम होणार नाही, असे वाटत असताना देखील शेतकरी विशेषतः महिला शेतकर्यांनी मोठी गर्दी केली होती. मुलकी ग्राऊंड या फुटबॉल स्टेडीअमवर मोठा चिखल झालेला होता. तरीही शेतकरी आपआपल्या गाड्या मैदानात लावून ही सभा भरपावसात ऐकत होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मेघालयत पिकवला जाणारा, फणस, बिन्स, अननस, सुपारी, कोबी प्लॉवर यांना बाजारात मिळतो तो दर घेण्याची पाळी आहे. लोकसभेत हमीभावाचा कायदा संमत होईल, त्यावेळी या सर्व पिकांना व पालेभाज्यांना किमान उत्पादन खर्च भरून मिळेल, एवढा दर निश्चितच मिळेल. सरकार ऊस खरेदी करत नाही, तरीही उसाला हमीभाव कायद्याने मिळतो, तर इतर पिकांना हमीभाव का मिळत नाही, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. यासाठी देश पातळीवर जी चळवळ सुरू आहे. त्या चळवळीमध्ये तुम्ही सहभाग घेताय, हे निश्चितच सुखावह आहे.
मेघालयातील शेतकर्यांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी आम्ही देशभरातील शेतकरी नेते आम्ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे राहू. अशी ग्वाही त्यांनीयावेळी दिला. यावेळी संघटनेचे प्रमुख कमाडंर सिकलाँग , मुख्य सचिव अलफाँन यांनी एका महिन्यात मेघालयातील प्रत्येक गावातील गावसभेचा ठराव घेऊन दिल्लीला पोहच करतो, अशी घोषणा केली. ही सभा संपल्यानंतर शिलाँगच्या नेत्यांना घेऊन राज्यपाल सत्पपाल मलिक यांची भेट घेतली.
मेघालयाच्या बाजारसमितीमध्ये शेतकर्यांची लूट होत आहे. शेतकर्यांकडून शेतीमालच्या वजनात दहा टक्के वजावट करून पैसे दिले जात आहे. देशात कुठेही अशी पध्दत नाही. शेतकर्यांची लूट करणार्या संबंधित व्यापार्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मेघालयचे राज्यपाल सत्पपाल मलिक यांच्याकडे केली. त्यावर राज्यपाल मलिक यांनी ही प्रथा त्वरीत बंद करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले