Raju Shetty । लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढणार असल्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर स्वतः राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलंय.
हातकणंगलेची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात येणार होती Raju Shetty ।
शिवसेनेसोबतच्या मुद्द्यावरून बोलताना राजू शेट्टी यांनी, स्वाभिमानीने गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची स्वतंत्र तयारी केली होती. परंतु, मधल्या काळात भाजपाविरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही मविआघाचा पाठिंबा घ्यावा असा विचार आमच्या काही सदस्यांनी मांडला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सांगत होते की, ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नाहीत. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार, असं म्हणत होते.
मविआने हातकंणगलेत उमेदवार देऊ नये, जेणेकरून भाजपाच्या विरोधातील मतांची विभागणी होणार नाही, अशी भूमिका घेऊन मी दोन वेळा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. आमच्यात यावर सविस्तर चर्चा झाली. त्यातले काही मुद्दे उद्धव ठाकरे यांना पटले. त्यावर त्यांनी लवकरच निर्णय घेऊ असं सागितलं होतं.
“…त्यामुळे मी मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही” Raju Shetty ।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख म्हणाले, काही दिवसापूर्वी अचानक काय झालं माहिती नाही, मला ठाकरे गटाकडून निरोप आला की, मी मशाल चिन्हावर निवडणूक लढली पाहिजे. परंतु, मशाल हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं चिन्ह आहे. ते चिन्ह घेणं म्हणजे मी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केलाय असा त्याचा अर्थ होतो. मी गेली ३० वर्षे शेतकरी चळवळीत काम करत आहे. मी आयुष्यात कोणत्याही राजकीय पक्षात काम केलेलं नाही.
निवडणूक लढवता यावी म्हणून आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून अनेकदा निवडणुका लढवल्या. परंतु, आता व्यक्तीगत अथवा राजकीय फायद्यासाठी मी शेतकऱ्यांना आणि संघटनेला वाऱ्यावर सोडून निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार नाही असं ठाकरे गटाला कळवलं आहे. त्यावर त्यांनी आता हातकणंगलेत उमेदवार जाहीर केला आहे. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही आधीच स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.