बेंगळुरू – महाराष्ट्रातील राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सीमाप्रश्नांचा वापर करू नये, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. कर्नाटकची एक इंचही जागा महाराष्ट्राला दिली जाणार नाही, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. कर्नाटकची भूमी महाराष्ट्राला देण्याऐवजी आज महाराष्ट्रात जो कन्नड भाषिकांचा भाग आहे तो भाग महाराष्ट्रातून कर्नाटकात घेण्यासाठी आमचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या लढ्याला आपला पाठिंबा राहील, असे विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केले होते त्या अनुषंगाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या राजकीय संकट निर्माण झाले आहे. म्हणून ते बोगी तयार करण्यासाठी अशी भाषा वापरतात. त्यांना राजकीयदृष्ट्या सीमा प्रश्नाचे राजकारण करायचे असते त्यावरच त्यांचे अस्तित्व अवलंबून असते असेही त्यांनी म्हटले आहे.
तथापि सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका अतिशय स्पष्ट असून, राज्य काही केल्या तोडले जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. केवळ राजकीय अस्त्विातासाठी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी सीमा प्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले आहे.
आम्ही महाराष्ट्राच्या स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करीत असताना.
कर्नाटकातील बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर ठिकाणची मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात विलीन होऊ शकली नाहीत, याची आम्हाला खंत आहे. महाराष्ट्राचा भाग होण्यासाठी त्यांचा लढा आहे. जोपर्यंत ही गावे महाराष्ट्राचा भाग होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या लढ्याला आम्ही पाठिंबा देत राहू, अशी ग्वाही अजित पवार यांनी रविवारी महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त दिली होती. बेळगावच्या सीमावर्ती भागातील आठशे गावे महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी गेले अनेक वर्षे लढा देत आहेत.