मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील महाराष्ट्र कलादालनाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. तसेच, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचा विसर पसर पडला आहे का? असा सवाल देखील केला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिलं. पण या बलिदानांचा आपल्याला विसर पडला आहे का? हा प्रश्न आज विचारण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं काही की शिवाजी पार्कवर जे संयुक्त महाराष्ट्राचं कलादालन जे उभारलेलं आहे, ते आज अंधारात आहे. कुठलीही विद्यूत रोषणाई आज केलेली नसल्याची आठवण नितेश राणे यांनी करून दिली.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, “गेल्या सहा महिन्यापासून स्थायी समितीने या कलादालनाला विद्यूत रोषणाई करावी यासाठी मान्य केलेला जो प्रस्ताव आहे. तो धूळ खात पडलेला आहे, त्यावर कुठलीही चर्चा झालेली नाही किंवा काम झालेलं नाही.”असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच, “आपल्या फोटोग्राफीसाठी आपल्याला त्या कलादालनातील एक मजला आवडला आहे, असं आम्ही ऐकतोय. मग जसा जुना महापौर बंगला आज ठाकरेंची खासगी मालमत्ता झाली आहे, तसंच हे कलादालनही ठाकरेंची खासगी मालमत्ता तर होणार नाही ना? अशी भीती आज समस्त मराठी माणसांमध्ये आहे. आपला मुलगा राज्याचा पर्यटनमंत्री आहे. मग का नाही या कलादालनाला आपण महाराष्ट्र पर्यटन कॉर्पोरेशनमध्ये सूचित केले?” असेही नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या सवालावर सेनेकडून काय उत्तर येणार हे पाहणे गरजेचे आहे.