आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सला सलग आठ पराभव स्वीकारावे लागले. जे घडले ते अनपेक्षित होते. मात्र, या पराभवांसाठी एकटा इशान किशनच जबाबदार कसा असेल. चित्र तर असे तयार केले जात आहे की, बाकीच्यांनी जिवापाड प्रयत्न केले व इशान एकटा अपयशी ठरला व त्यामुळे हे पराभव झाले. आपल्याकडे खापर कोणावर फोडायचे ते आधीच ठरवलेले असते व त्याच्याच डोक्यावर ते फोडलेही जाते.
यंदाच्या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रावीस, सूर्यकुमार यादव व डॅनियल सॅम हे सातत्याने अपयशी ठरले. इशानसह यातील काही फलंदाजांनी एखाद्या सामन्यात मोठी खेळी केली. मात्र, तरीही ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. जे फलंदाजांच्या बाबतीत घडले तेच काही फरकाने गोलंदाजांच्या बाबतीत ठरले.
भारतीय गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र मानला जात असलेला जसप्रीत बुमराह या संपूर्ण स्पर्धेत फारच सुमार वाटला. एखादा क्लब दर्जाचा गोलंदाज वाटला. त्याच्यासह जयदेव उनाडकट, हृतिक शोकीन, सॅम, रेले मर्डीथ, पोलार्ड यांनाही सासत्याने अपयश आले. एकटा तिलक वर्माच काय तो सातत्यपूर्ण फलंदाजी करताना दिसला. मुंबई संघाने या स्पर्धेत सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे, पण यंदाची त्यांची कामगिरी पाहता नक्की कुठे बिनसले आहे तेच खुद्द रोहित शर्मालाही सांगता येत नव्हते हे सामना संपल्यानंतरच्या त्याच्या मतांवरून लक्षात येत होते.
पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये अपयशाचा सामना करावा लागला तर लगेचच कर्णधारावर संक्रांत येत होती, आता काळ बदलला आहे. खुद्द कर्णधारच अपयशी ठरला तरीही खापर मात्र अन्य कोणत्या तरी खेळाडूवर फोडले जाते. यंदाच्या वर्षी खापर फोडण्यासाठी इशानचे डोके मिळाले आहे.
दस्तुरखुद्द विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही इशानवर टीका केली आहे. त्याचे वय पाहता त्याच्यासमोर मोठी कारकीर्द आहे, निदान टीका करताना किंवा खापर फोडताना त्याची कारकीर्द धोक्यात येईल किंवा वेळेपूर्वीच संपुष्टात येईल, त्याच्या मानसिकतेवर परिणाम होईल याची खबरदारीही कोणी घेतली नाही. पराभवापेक्षा शल्य या गोष्टीचे जास्त वाटते.