नवी दिल्ली – सध्या जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतात आपली गरज भागविण्यासाठी विविध स्त्रोतांकडून कच्चे तेल मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. ब्राझील या देशाबरोबर भारत कच्चे तेल मिळवण्यासाठी वाटाघाटी करीत आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
ब्राझीलचे पेट्रोलियम मंत्री बेंटो अल्बर्क सध्या भारत भेटीवर आले आहेत. यावेळी या दोन्ही नेत्यांनी या विषयावर तपशिलात चर्चा केली. ब्राझील देशाबरोबर कच्च्या तेलासाठी दीर्घ पल्ल्याचे कंत्राट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुरी यांनी सांगितले.
सध्या भारत ब्राझील कडून अल्प प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. भारत सध्या मध्यपूर्वेतील देश आणि अमेरिकेतून जास्त प्रमाणात कच्चे तेल आयात करतो.
मात्र रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत उलथापालथ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताची गरज भागावी याकरिता विविध देशाकडून कच्चे तेल आयात करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे.
बाझील या देशाला तेलाचे उत्खनन आणि शुद्धीकरण करण्यासाठी भांडवलाची गरज आहे. अशा परिस्थितीत भारत ब्राझीलमध्ये या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकतो.
भारतातील अनेक तेल कंपन्या ब्राझीलमध्ये उत्खनन आणि तेल शुद्धीकरण क्षेत्रात गुंतवणूक करु इच्छीत आहेत. ब्राझील आणि भारत या दोन्ही अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहेत. त्यामुळे परस्परांच्या मदतीसाठी या अर्थव्यवस्थानी प्रयत्न करण्याची गरज आहे. या विषयावर दोन्ही देशांदरम्यान मतैक्य झाल्याचे सांगण्यात आले. ब्राझीलकडून खाद्यतेल मिळविण्याच्या शक्यतेवर भारत विचार करीत असल्याचे सांगण्यात येते.