मुंबई – विराट कोहली सध्या बॅडपॅचमधून जात आहे. सराव सत्रात तो कठोर मेहनत घेत आहे. मात्र, तरीही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. त्याची मानसिकता नकारात्मक बनल्यामुळेच हे घडत आहे, पण तो निश्चितच यावर विजय मिळवत यशस्वी होईल, असे मत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केले आहे.
विराटला 2019 सालापासून मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने आपले अखेरचे शतक बांगलादेशविरुद्ध फटकावले होते, त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय शतक साकारता आलेले नाही. तसेच तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही सातत्याने अपयशाचा सामना करत आहे. मी प्रशिक्षक म्हणून त्याला सरावादम्यान सातत्याने टिप्स दोत आहे, पण त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत होताना दिसत नाही. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा बॅडपॅच येतच असतो. विराट सध्या याच संकटाचा मुकाबला करत आहे. एक मोठी खेळी त्याच्याकडून घडली तर त्याचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा गवसेल, असेही बांगर म्हणाले.
बेंगळुरूचे सराव सत्र सुरू असते तेव्हा विराट फलंदाजीवर अत्यंत गंभीरपणे लक्ष ठेवत असतो. वेगवेगळ्या गोलंदाजांचा सामना करताना त्याचे तंत्र कुठेही कमी पडताना दिसत नाही. मग तरीही प्रत्यक्ष सामन्यात असे काय घडते ते आम्हालाही समजत नाही. मात्र, विराटचा दर्जा खूप मोठा आहे.
असे खेळाडू फार काळ अपयशी राहू शकत नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच विराटच्या बॅटमधून मोठी खेळी साकारेल व तो पुन्हा एकदा यशाच्या मार्गावर वाटचाल करेल. त्याचे तंत्र भक्कम आहे. तो केवळ फुटवर्क तसेच शॉर्ट सिलेक्शनच्या बाबतीत चुकत आहे. मात्र, तोच यातून मार्ग काढेल, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला आहे.