पुणे – महापालिकेकडून दहावी आणि बारावीच्या गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीचा 20 कोटींचा निधी संपल्याने तब्बल 2,777 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 6 कोटी 14 लाखांचा निधी कमी पडत असून तो तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या या शिष्यवृत्तीसाठी यंदा 12 वीसाठी 8 हजार 96, तर दहावीसाठी 7 हजार 878 असे 15 हजार 974 अर्ज आले होते. महापालिकेने केलेल्या पडताळणीनंतर सुमारे 13 हजार 31 अर्ज पात्र ठरले. त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार होती.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि 40 टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर 10 वीच्या विद्यार्थ्यांना 15 हजार आणि 12 वीसाठी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
निधी उपलब्ध होताच शिष्यवृत्तीचे वाटप
महापालिकेच्या 2021-22 च्या अंदाजपत्रकात या शिष्यवृत्तीसाठी 20 कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार, महापालिकेने 31 मार्चपूर्वी बिले तयार झालेल्या मुलांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यास सुरुवात केली. मात्र, आर्थिक तरतूद संपल्याने तिचे वाटप बंद झाले. एप्रिल महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून याची चौकशी सुरू केली. यावेळी उपलब्ध निधीतून 10 हजार 554 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून उर्वरित 2,777 विद्यार्थ्यांसाठी 6 कोटी 14 लाख 15 हजार रुपयांची अतिरिक्त गरज असून हा निधी उपलब्ध होताच शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.