पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांनी शहर हादरले आहे. हिंजवडी आणि चिखली येथील खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खून, लैंगिक अत्याचार, दरोडा, घरफोडी, चोऱ्या अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारांचा सहभाग असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. परप्रांतीय आरोपींना शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. तसेच गुन्ह्यांची उकल करण्यातही अडचणी येत आहेत.
चिखली येथील लक्ष्मण देवासी या आठ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी बपीलअहमद रईस लष्कर (वय 26) हा सध्या कुदळवाडी परिसरात राहत असला तरी तो मूळचा आसाममधील सिलचर जिल्ह्यातील आहे. गेल्या तीन वर्षापासून तो शहरात वास्तव्यास आहे.
रविवारी सायंकाळी बावधन येथे राजू महातो या 36 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी सुनील चौहान, मुन्ना चौहान (दोघेही रा. राज्य बिहार), योगेन्द्र राम आणि बलिंदर राम (दोघेही रा. उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे परप्रांतीय असल्याने शहरातील परप्रांतीय गुन्हेगारांकडून केलेल्या गुन्ह्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी बोपखेल येथे दोन वर्षीय मुलीवर लष्कराच्या हद्दीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी कुलेश्वर ठाकुर हा मुळचा झारखंडमधील आहे. तसेच 2018 मध्ये भाटनगर येथील एका बालिकेला खाऊचे अमिष दाखवून तिच्यावर एच. ए. मैदानातील झुडपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्या मुलीचा खून केला. या गुन्ह्यातील आरोपीही परप्रांतीय होता. हे सर्व आरोपी शहरात राहून त्यांनी गुन्हे केले आहेत.
मात्र केवळ गुन्हे करण्यासाठीही काही परप्रांतीय टोळ्या शहरात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहेत. 2019 मध्ये हरियानातील आठ जणांची टोळी शहरात आली होती. या टोळीने पुणेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. तसेच हरियाना मधील आणखी एका टोळीने शहरातील एटीएम फोडण्याचा सपाटा लावला होता. चिखली येथील सोनाराकडे काम करणाऱ्या राजस्थानमधील आरोपीने तीन किलो सोने चोरून मूळगाव धूम ठोकली होती.
घरमालक येताहेत अडचणीत
अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी गुन्हा करून आपल्या राज्यात पळून जातात. अशा आरोपींची घरमालकाने भाडेकरू म्हणून पोलिसांकडे नोंद केलेली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. केवळ भाडेकरूंची नोंद न केल्याने घरमालक अडचणीत येत आहेत. अशाच प्रकारे व्यावसायिकांनीही आपल्याकडील कामगाराची नोंद पोलिसांकडे करणे आवश्यक आहे.