नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यासंदर्भात आता पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राज्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.
दिल्लीत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ८ टक्क्यांवर पोहोचले असून, महाराष्ट्रातही मंगळवारी दुप्पट रुग्णवाढ नोंदवण्यात आली़ रुग्णवाढीमुळे मुंबईत यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या करोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे.
करोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊले उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. करोना संसर्ग वाढल्यामुळे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिले असून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पत्रामध्ये करोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत करोनाचे 600 हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे तिथला करोना रुग्ण सकारात्मकता दर 7 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. मागील चार आठवड्यांपासून दिल्लीमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत. सकारात्कमकता दर 1 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर पोहोचला आहे.