औरंगाबाद – शैक्षणिक, भौतिक, मानसिक पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून जागतिक पातळीवर ते यशस्वी व्हावेत, आदर्श व जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी शिक्षण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशपातळीवर पहिल्यांदाच शाळा पूर्व तयारी अभियान होत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ औरंगाबादेतून होत असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याचे उद्घाटन गायकवाड यांच्याहस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या वर्षीपासून राबवण्यात येत असलेल्या शाळा पूर्व तयारी अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, भौतिक आणि मानसिक आदींसह सर्वांगीण विकासाबरोबरच विविध विषयांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. या अभियानामुळे पाल्यांमध्ये जिज्ञासूवृत्ती वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. या अभियानाला लोक चळवळीत रूपांतरीत करण्यासाठी ग्रामस्थ, सरपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केली.
मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या दुरूस्तीसाठी 107 कोटींपैकी 92 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. आदर्श शाळा या संकल्पनेंतर्गत राज्यातील 488 शाळांना मागीलवर्षी 54 कोटी तर यावर्षी 300 कोटी रुपये देणार असल्याचेही मंत्री गायकवाड म्हणाल्या.