नागपूर – देशात आणि राज्यात सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या “आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे हजेरी लावली. हा प्रकाश सोहळा मल्लिकार्जुन खर्गे, के. राजू, सेल्वम, केव्हिन ब्राऊन, प्रा. सुखदेव थोरात, प्रा. प्रदीप आगलावे यांच्या उपस्थितीत पार पडला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. ज्या गोष्टीवर हे स्वातंत्रय टिकून आहे. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेली घटना (भारतीय संविधान). बाबासाहेबांनी फक्त घटनाच लिहिली असे नाही, तर भविष्यात काय अडथळे येऊ शकतात हे ही आपल्याला दाखविले असून त्याबद्दलचा मार्ग ही दाखविला आहे.
दुसरीकडे अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. अंधभक्त म्हणजे काय नुसतं उदो उदो करत सुटायचं. तसेच अंधभक्त काही-काही वेळेला दैवत बदलू शकतो. पण त्याचा जिकडे फायदा असतो, तिकडे तो झुकतो, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
राज्यात मागच्या अडीच वर्षात कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे आगळेवेगळे तयार झालेले रसायन आहे. नितीन राऊत यांनी अभ्यासपूर्वक पुस्तक लिहिले याचा मला आनंद आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार हे दिशा दाखवणारे असतात. संविधाननुसार काम करताना कोणत्या अडचणी येतात हे सांगितले व त्याचे मार्ग पण सुचवले. फक्त जयंती साजरी करताना पुष्पगुच्छ देऊन चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणे देखील तितकेच महत्वाचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.