मुंबई – करोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादले. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर करोना पसरवण्याचा आरोप केला त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी करोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात करोना पसरला असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था केली, जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोक भोगत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.