पुणे – रेंजहिल्स येथे भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. त्रासाबाबत अनेकवेळा तक्रार करूनसुद्धा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बोर्ड क्रमांक 6 च्या महिला शाखा अध्यक्ष रोहिणी गणेश बोरसे यांनी या मागणीला वाचा फोडली. भटक्या कुत्र्याचा बदोबस्त करण्याची मागणी बोर्डाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या भटक्या कुत्र्यांमुळे अनेकदा मोठे अपघात घडले आहेत. परिसरातील अनेक लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावरती धावून जाऊन चावा घेतला आहे. प्रशासन कुठला मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून पुढील पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बोरसे यांनी दिला.
त्यावेळी त्यांच्याबरोबर दीपाली दिवेकर, तेजस्विनी पाटील, अनिता शिंदे, कविता शिंदे, रसिका माने, आखिलेश सिंग, किरण वाघ आदी उपस्थित होते. तसेच वार्ड क्रमांक सहा मधील ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.