नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात जातीय किंवा धार्मिक मुद्यांना प्राधान्य देऊन निवडणूका लढवल्या व जिंकल्या जातात. या वातावरणातून आता राज्याला बाहेर आणण्याची गरज आहे, त्यासाठी एका वेगळ्या राजकारणाचीही गरज असून आम्ही त्या दृष्टीने येथे काम करीत आहोत. रोजगार, आरोग्य, शिक्षण सुविधा अशा मुख्य आणि विधायक मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक असून नकारात्मक पद्धतीच्या राजकारणाला नाकारण्याची गरज आम्ही लोकांना पटवून देत आहोत असे कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
आज पीटीआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संबंधात सरकारने घेतलेली हुकुमशाही प्रवृत्तीची भूमिका आणि लखीमपुर खेरीचे प्रकरण या पार्श्वभूमीवर पश्चिमी उत्तरप्रदेशातील यावेळचे निकाल वेगळे लागतील. शेतकरी आंदोलनाचा या भागात चांगलाच प्रभाव आहे, हाच प्रभाव यावेळच्या निवडणूक निकालांवर दिसून येईल असे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन जी प्रचाराची रणनिती आखली आहे त्याला किती यश मिळेल असे विचारता त्या म्हणाल्या की, राजकारणात महिलांची मते हा आता एक वेगळा मुद्दा राहिला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. महिला संघटीतपणे मतदान करून आपली राजकीय शक्ती दाखवून देऊ शकल्या तर त्यातून त्यांचेही भवितव्य निश्चीत सुधारल्याशिवाय राहणार नाही कारण मग महिलांच्या संबंधात प्रत्येक राजकीय पक्षाला यापुढील काळात स्वतंत्र विचार करावाच लागेल.
उन्नावच्या पिडीत मुलीच्या आईला कॉंग्रेसने तिकीट दिले आहे. त्यावर बोलताना प्रियंका म्हणाल्या की तुम्ही आमदार आहात म्हणून काहीही करू शकता आणि त्याच्या अन्यायाच्या विरोधात महिलांनी बोलायचेच नाही अशी जी एक सिस्टीम तयार झाली आहे, त्याच्या विरोधात आम्ही तेथे पीडीतेच्या आईला उमेदवारी दिली आहे. त्यातून त्यांना जी शक्ती मिळेल त्या आधारे त्या आपली जीवन पुन्हा सुधारू शकतील. याच भावनेतून आम्ही पूनम पांडे, आशा बहु, अशांना उमेदवारी देऊन आम्ही एक नवीन संदेश देऊ केला आहे असे त्या म्हणाल्या.
भारतीय जनता पार्टी आणि समाजवादी पार्टी हे दोन्ही पक्ष धृवीकरणाचेच राजकारण करीत आहेत आणि तोच त्यांचा आजवरचा मुख्य आधार राहिला आहे, हे वातावरण बदलण्यासाठी खऱ्या विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या अजेंड्यावर येणे गरजेचे आहे असे प्रियंकांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. वेगळ्या प्रकाराच्या राजकारणाला आम्ही आता महत्व देतो असे आता लोकांनीही दाखवून दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.