नवी दिल्ली – काही महिन्यांपूर्वी तामिळ सुपरस्टार ‘सूर्या’ची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ सिनेमा अमेझॉनवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं जोरदार कौतुक झालं आहे.
या चित्रपटात प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जगभरात या चित्रपटाचा बोलबाला झाला असून, आता तर चित्रपट सृष्टीत मानाचं स्थान असलेल्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी ‘जय भीम’ सिनेमा निवडला गेला आहे.
गुरुवारी (दि. २०) रात्री ऑस्कर समितीने सिनेमांची यादी जाहीर केली. यात जगभरातील एकूण २७६ चित्रपट असून भारताकडून ‘जय भीम’ व्यतिरिक्त मल्याळम चित्रपट ‘मरक्कर’चाही समावेश करण्यात आला आहे. ‘मरक्कर’ चित्रपटात मुख्य भूमिका प्रसिद्ध मल्याळी अभिनेते मोहन लाल यांची आहे. यामुळे सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.
ऑस्कर समितीने निवडलेल्या सर्व सिनेमांवर २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सिनेमातल्या विविध विभागांसाठीची नामांकने जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ऑस्करचा अंतिम पुरस्कार सोहळा २७ मार्च रोजी अमेरिकेत होणार आहे. यंदाचा हा ९४ ऑस्कर पुरस्कार सोहळा असून, यासाठी आता पासून तयारी सुरु करण्यात आली आहे.