नवी दिल्ली – भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे राहिलेले नाही. आता तरी त्याने आपला अहंकार सोडायला हवा. समोरचा खेळाडू कोणीही असो त्याच्या नेतृत्वाखाली कोहलीने मनापासून खेळायला हवे, असे मत भारताचे महान कर्णधार व अष्टपैलू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
कोहली बराच काळ दबावात दिसत होता. आता त्याला अहंकार सोडून नव्या कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडले.
त्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेतले गेले. आता तर त्याने कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले आहे.
पुढील काळात कोहलीने नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत असताना आपला अहंकार बाजूला ठेवून संघहित लक्षात घेत खेळले पाहिजे, असेही कपिल यांनी सांगितले.