नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पंजाब मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. तेथे आता 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या बदलाविषयी निवडणूक आयोगाने कॉंग्रेस, अकालदलासह सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच हा बदल केला आहे.
14 फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती आहे. या दिवशी उत्तरप्रदेशातील बरेच भाविक संत रविदास यांच्या उत्तरप्रदेशातील स्थानाला भेट देण्यासाठी जात असतात. त्यामुळे मतदानाची ही तारीख सहा दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी मुख्यमंत्री चन्नी यांनी आयोगाला पत्र पाठवून केली होती.
आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ही सुचना मान्य केली.भाजपनेही ही मागणी केली होती. त्यांनीही त्यासाठी आयोगाला पत्र पाठवून संत रविदास यांच्या दिवशी होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पंजाबात एकाच टप्प्यात मतदान होणार होंते. त्यानुसार आता 20 फेब्रुवारी रोजीही एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबात सुमारे 32 टक्के नागरीक अनुसुचित जातीचे आहेत.