Chhagan Bhujbal – कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होते की मी ओबीसी एल्गार सभेला जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावे लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला.
परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही, असे स्पष्टीकरण ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
ते पुढे म्हणाले, विरोधकांनी टीका केली की मंत्रिमंडळात बसता आणि सरकार विरोधात बोलता. विरोधकांच्या या टीकेवर मी गप्प बसलो. पण सरकार पक्षातील एक आमदार म्हणाला की, भुजबळला लाथ मारून बाहेर काढा. लाथा मारायची भाषा ऐकली तेव्हा मी म्हणालो की राजीनामा दिल्याचे आता नाही सांगणार तर कधी सांगणार?
त्यावर मी काही बोललो नसतो तर म्हणाले असते किती बेशरम माणूस आहे की खुर्चीला चिकटून बसला आहे. कोणी मला लाथ मारण्याची गरज नाही. त्यामुळे मी म्हणालो की राजीनामा दिला आहे, जा जाऊन तो स्वीकारा, असे छगन भुजबळ म्हणाले.
खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहले जातंय
मराठा समाज शक्तीशाली लोक आहे. त्यांच्यात गरिबी आहे. पण गरिबी कुठे नाही? मला आरक्षण असताना मी आरक्षण घेतले नाही. मी खूपपूर्वी सवलत घेतली होती. पण मी आणि माझ्या मुलांनी आरक्षण घेतले नाही. पण तरीही मी लढतोय. कारण, ओबीसी समाजातील ५४ टक्के लोक शिक्षणापासून वंचित आहेत.
त्यांना जरा पाठिंबा मिळाला तर ते इंजिनिअर, डॉक्टर बनतात आणि कुटुंबाला पुढे नेतात. पण आता सगळे संपतंय. खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिले जात आहेत. ते कुणबी झाले तर ते ओबीसी बनतील. त्यामुळे, आम्ही काय म्हणतोय त्यांना वेगळे आरक्षण द्या. पण हे मागच्या दाराने येत आहेत, अशी टीकाही छगन भुजबळांनी केली.