मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळांसह कुटुंबियांच्या निर्दोष दिलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यात पंकज भुजबळ, समीर भुजबळ, देवदत्त मराठे, तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांच्यासह राज्य सरकारलाही प्रतिवादी बनवण्यात आले आहे.
सदर याचिका तक्रारदार अंजली दमानिया यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यान याच प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या विकासक चमणकर यांच्यातर्फे अंजली दमानियांविरोधात हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सप्टेंबर 2021मध्ये महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती.
महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टापुढे अर्ज सादर केला होता. यादोघांसह याच प्रकरणातील अन्य आरोपी पंकज भुजबळ, तन्वीर शेख, ईरम शेख, संजय जोशी आणि गीता जोशी यांनाही दोषमुक्त केले आहे. याप्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एसीबीच्या तपास अधिका-यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही न्यायालयाने आपल्या निकालात ठेवला आहे.