नवी दिल्ली – काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. देशभरात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन करोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कडक निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. दिल्लीतही करोनाची प्रकरणे वाढत असल्याने येथील शाळा, काॅलेज बंद करण्यात आली आहेत. तसेच मंगळवारी विकेंड लाॅकडाऊनचीही घोषणा करण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रकरणांचा विवाहांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरात सुमारे 30 लाख विवाह होणार आहेत. आता करोनाने या लग्नसोहळ्यांचे बजेटही बिघडवले आहे.
दिल्लीतील लोक निर्बंधांमुळे मुलांचे लग्न करण्यासाठी यूपीला जाण्याचा विचार करत आहेत. कारण, दिल्लीतील लग्नसोहळ्याला केवळ 20 लोकच उपस्थित राहू शकतात. त्यामुळे बँक्वेट हॉल, टेंट हाऊस, तसेच लग्नाशी संबंधित सर्व लोकांसमोर उदरनिर्वाहाचे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. केजरीवाल सरकारने मर्यादित मेळाव्यास परवानगी देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान, दिल्लीतील प्रीत विहार येथे राहणाऱ्या रजत कुमार यांच्या मुलीचे लग्न 23 जानेवारीला आहे. त्यांनी दिल्लीचा बँक्वेट हॉल बुक केला होता. मात्र करोनामुळे तो बंद करण्यात आला आहे. आता ते उत्तर प्रदेशात बँक्वेट हॉल शोधत आहेत.
ईस्ट दिल्ली टेंट हाऊस फेडरेशनचे अध्यक्ष गुरमीत सिंग म्हणाले की, दिल्लीत 1000 हून अधिक बँक्वेट हॉल आणि टेंट हाऊस आहेत. दोन वर्षांपासून हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त झाला आहे. आता पुन्हा करोना आल्याने संबंधित कामगारावर उपसमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. सरकारने मर्यादित मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने दावा केला आहे की, जानेवारी ते मार्च या काळात देशभरात होणाऱ्या सुमारे 30 लाख विवाहांना कोरोनाचा फटका बसेल. त्यामुळे बँक्वेट हॉल, हॉटेल्स, टेंट हाऊसशी संबंधित 3 लाख कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. याचा या घटकांवर मोठा परिणाम होणार आहे, आता अशा परिस्थितीत सरकारने सावधगिरीने लॉकडाऊन लागू केले पाहिजे, असे सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.