नवी दिल्ली : देशात सध्या छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. “जे लोक मुस्लिमांच्या नरसंहाराचं आवाहन करत आहेत ते लोक खरं तर देशामधील गृहयुद्धाचं आवाहन करत आहेत,” अशी टीका शाह यांनी केली आहे.
एक संकेतस्थळाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये शाह यांनी, सध्या जे काही सुरु आहे ते पाहून धक्का बसतो असेही म्हटले आहे. वादग्रस्त विधानं करणारे नक्की काय बोलत आहेत याचा त्यांना अंदाजही नसावा असेही शाह म्हणाले आहेत. ते लोक ज्या प्रकारचे आवाहन करत आहे ते एखाद्या गृहयुद्धाप्रमाणे आहे, अशी टीका शाह यांनी मुलाखतीमध्ये केली आहे.
२० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं वक्तव्य करु शकत नाही, असे म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी आपला संताप व्यक्त केला. पुढे बोलताना शाह यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात लोक लढण्यासाठी मुस्लीम तयार आहेत, असाही विश्वास व्यक्त केला आहे.
मुस्लीम अशा वक्तव्यांविरोधात लढण्यास तयार आहेत कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढान् पिढ्या इथेच राहिल्यात आणि इथेच मरण पावल्यात, असे शाह म्हणाले. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी वक्तव्य करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल, असा टोलाही शाह यांनी लगावला आहे.
अशाप्रकारच्या वक्तव्यांविरोधात कोणत्याही प्रकारचे आंदोलन सुरु झालं तर त्याने मोठं नुकसान होईल, असे आपल्याला वाटत असल्याचेही शाह यांनी म्हटले आहे.