मुंबई – मागील काही दिवसांपासून आमली पदार्थ प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत. त्यातच सुपरस्टार शाहरुख खानच्या लेकाला अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली एक महिना कारागृहात काढावा लागला. त्यानंतर एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यांच्यावर अनेक आरोपही झाले. आता त्यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अर्थातच भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांचा ३१ डिसेंबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच अंमली पदार्थ नियंत्रण विभागातील कार्यकाळ संपणार आहे. या विभागात मुदतवाढ नको असल्याचं खुद्द वानखेडे यांनी म्हटल्याचं, एनसीबीने सांगितलं आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना पुढची पोस्टींग कुठे मिळणार या चर्चांना उधाण आलं आहे.
वानखेडे सप्टेंबर २०२० पासून एनसीबीमध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. सध्या ते अंमली पदार्थविरोधी संस्थेचे मुंबई विभागाचे संचालक आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अटकेनंतर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. अनेक साक्षीदारांनी देखील त्यांच्यावर आरोप केले आहे. त्यामुळे वानखेडे यांची चौकशी देखील करण्यात येत आहे.
वानखेडे यांनी अनेक प्रकरणांमध्ये खोट्या पद्धतीने हाय प्रोफाईल लोकांना फसविल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर वानखेडे माध्यमांमध्ये चर्चेत आले होते. वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी मागासवर्गीय सवलत घेऊन नोकरी मिळविल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. एकंदरीतच वानखेडे यांची एनसीबीमधील कारकिर्द वादग्रस्तही ठरली आहे.