फुरसुंगी –ऐतिहासिक दिवेघाटात राडारोडा यासह हॉटेल, खानावळवाले कचरा टाकत असतानाच आता त्यात रुग्णालय तसेच पॅथोलॉजी लॅबमधील कचराही टाकला जात आहे. घाटमार्गातील वळणांवर तसेच खोल दरीत असा कचरा टाकला जात असून यातून वन्यप्राण्यांसह पर्यटन, ट्रेकिंग करणाऱ्या नागरिकांनाही धोका आहे.
दिवेघाटात कचरा टाकला जात असल्याबाबतच्या तक्रारी बांधकाम विभागासह जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आल्यानंतर घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती; परंतु आता गेल्या काही महिन्यांत घाटात कचरा टाकण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. यात वैद्यकीय कचऱ्याचीही भर पडली असून रक्त, लघवी तपासणीसाठीचे नमुने घेण्यासाठी वापरण्यात आलेल्या बाटल्या, रक्ताने माखलेले सिरींज याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
हा कचरा धोकादायक असल्याने वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे.
याबाबत युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख शादाब मुलाणी म्हणाले की, घाटातील कचराप्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. काही वळणांवर गेल्यावर अतिशय दुर्गंधी सुटते. पोल्ट्री, फळविक्रेते, तरकारी वाहतूक करणारे वाहनचालक व विक्रेते तसेच हॉटेल, खानावळवाले कचरा टाकत आहेत. त्यातच आता काही रुग्णालय की पॅथोलॉजी लॅबकडून वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात आहे. ज्या ठिकाणी संरक्षक कठडे तुटले आहेत, तेथून असा कचरा दरीत टाकला जात आहे.
यातून घाटाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून असा कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. घाटात सर्व कठडे बसवावेत, ज्या ठिकाणी पडझड झाली आहे त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख शादाब मुलाणी, रुपेश मोरे, निलेश पवार, गणेश कामठे, मयूर शिंदे यांनी केली आहे.