पुणे – वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाबरोबरच कचरा जाळल्यानंतरच्या धुरामुळे होणारे हवेचे प्रदूषण पुणेकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. पुण्यात मोकळ्या जागेवर कचरा जाळण्याच्या सहाशेहून अधिक घटनांची नोंद गेल्या दोन वर्षांत घेण्यात आली आहे. या आगींचे स्वरूप मोठे असल्याने सजग पुणेकरांकडून अग्निशमन दलाला या आगींची माहिती देण्यात आली. मात्र, त्या व्यतिरिक्तही शहरात रात्री तसेच सकाळच्या वेळेत कचरा जाळल्याने विषारी वायूंच्या प्रदूषणाचा फटका पुणेकरांना बसत आहे.
शहर परिसरात अनेक ठिकाणी सर्रासपणे उघड्यावर कचरा जाळला जातो. यामध्ये ओला कचऱ्यासह कागद, कपडे, टायर, प्लॅस्टिक यासारख्या सुक्या कचऱ्याचे प्रमाण अधिक असते.
मात्र, हा कचरा जाळल्याने त्यातील हानीकारक घटक धुराच्या माध्यमातून हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते. तसेच, अशा हवेच्या संपर्कात आल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळेच घनकचरा व्यवस्थापन कायदा 2016 अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उघड्यावर तो जाळण्यास प्रतिबंध असून, अशा घटनेस कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची तरतूदही आहे. मात्र, असे असतानाही शहरात कचरा जाळण्याचे प्रमाण जास्त आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरात गेल्या दोन वर्षांत कचरा जाळण्याच्या तब्बल 610 घटना घडल्या आहेत. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2020दरम्यान 362, तर जानेवारी ते ऑक्टोबर 2021 पर्यंत तब्बल 248 कचरा जाळण्याच्या घटना घडल्या आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली तयार केली असून, ती राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यातही आली आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासंदर्भात केलेल्या कामांबद्दल नियमितपणे देखरेख ठेवत आवश्यक त्यावेळी संबंधित यंत्रणांना नोटीस दिली जाते. पुणे महापालिकेलाही नुकतेच यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे.
– प्रताप जगताप, राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ
महापालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या सहकार्याने महापालिका हद्दीत कचरा संकलन आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम केले जाते. त्यामुळे महापालिका हद्दीत कचरा पडून राहणे, जाळणे याचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र, महापालिका हद्दीत समाविष्ट नसलेली मात्र शहरालगत असलेल्या गावांमध्ये कचरा संकलनासाठी सक्षम सुविधा नाहीत. अशा ठिकाणी कचरा उघड्यावर पडून राहणे, तो जाळला जाणे असे प्रकार घडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर कचरा संकलन आणि विल्हेवाट लावणे यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– हर्षद बडे, स्वच्छ संस्था
उद्यानातील कचरा जाळण्याचे प्रमाण अधिक
शहर परिसरातील विविध बागा, सोसायट्यांमधून संकलित केला जाणारा झाडांचा पालापाचोळा, रस्त्यावरील वृक्ष तोडल्यानंतर त्याच्या तुटलेल्या फांद्या असा “गार्डन वेस्ट’ जाळण्याचे प्रमाण पुण्यात अधिक आहे. काही ठिकाणी ओले लाकूड जाळले जाते.
कपडे आणि टायर घरातील जुने वापरात नसलेले कपडे, अंत्यविधीच्या वेळी स्मशामभूमींमध्ये सोडलेले कपडे, दान दिलेले मात्र वापरण्यायोग्य नसलेले कपडे हे अनेकद उघड्यावर अथवा नदी पात्रात फेकून दिले जातात. असे कपडे गोळा करून ते उघड्यावर, पुलांखाली, नदीपात्रात जाळले जातात.