मुंबई – भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केल्यावर संघ निवड कधी व कशी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यातही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला संघात स्थान मिळणार का, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी अजिंक्यसमोर संघात राहणे हेच मोठे आव्हान बनले आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तसेच आता नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेने केले होते. एखाद्या सामन्याचा अपवाद वगळता त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली, त्यामुळे त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले असून त्यासह त्याचे उपकर्णधारपदही हातातून जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अशा स्थितीत त्याची जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झाली तर ती रहाणेसाठी लॉटरीच असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या कसोटीत कोहली संघात परतला; पण रहाणे दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे आता तो पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतणार का, याचीच उत्सुकता लागली आहे.
कोहलीकडून पाठराखण
भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने मात्र रहाणेची पाठराखण केली आहे. त्याचे स्थान धोक्यात आहे किंवा उपकर्णधारपदही जाणार या वृत्ताचे कोहलीने खंडन केले आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत बॅडपॅच येतच असतो, कोणीही त्याला अपवाद नाही; मग एकट्या रहाणेलाच लक्ष्य करणे योग्य नाही, असे सांगत कोहलीने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळेल, असेच संकेत दिले आहेत.