– प्रा. स्नेहा गायकवाड
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. दलित चळवळ आणि दलित साहित्याने समाजाला एक दिशा दिली आहे. यात महिलांचाही सक्रिय सहभाग असणे हे विशेष. अशाच लेखणी हातात घेऊन समाजाला दिशा देणाऱ्या महिलांविषयी…
बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेले लिखाण तसेच शुद्र पूर्वी कोण होते?, थॉट्स ऑन पाकिस्तान, जातियतेचे उच्चाटन आदि ग्रंथांतून केलेले वैचारिक आणि सामाजिक क्रांतीचे लिखाण पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच दलित साहित्याचे खरे जनक.
शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शे.का.फे.) तर्फे रेवाराम कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम संमेलन संपन्न झाले. अंजली पवार या मुलीने दलित लेखकांची संमेलने भरली पाहिजेत, असे मत व्यक्त केले होते. मुलांना घडवण्यासाठी स्वतः घडले पाहिजे व उपेक्षित लोकांच्या विकासासाठी “भगिनींनो विचार करा, निश्चय आणि कृती करा’,
अशा शिर्षकाचे शे.का.फे. विद्यार्थी परिषदेच्या सहसेक्रेटरी कौसल्या नंदेश्वर यांनी इंग्रजीतून लेख लिहिला. अंत्यसंस्कार रुढीविषयी शारदा शेवाळे यांनी “अस्पृश्यांनी प्रेते गाडू नये, जाळावी’, हा लेख जनता साप्ताहिकात लिहिला. हाच धागा पकडून द्रौपदीबाई कांबळे, शांता शेवाळे यांनी लेखन केले. या दरम्यान वृत्तपत्राच्या माध्यमातून स्त्रिया चळवळीमध्ये सहभाग घेऊ लागल्या. जनतामध्ये संतती नियमांबद्दल लिहिले गेले. स्त्री-पुरुष समानतेच्या विचारसरणीचा, मिश्र विवाहाचा पुरस्कार करत असत.
पानकाबाई वानखेडे यांनी “अस्पृश्य वर्गातील स्त्री कर्तव्य’ या शिर्षकाखाली स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात अनास्था असल्यास स्त्रीच कारणीभूत असल्याचं सांगत जागृती निर्माण केली. नलिनी जगताप, पार्वताबाई पाचाडे यांचे लेखनही या संदर्भात महत्त्वाचे आहे. सुशिक्षित स्त्रिया स्वतः शिकल्यानंतर समाजात मिसळत नाही, गर्व येतो, लाज वाटते यावर यशोदाबाई साळवेंनी प्रश्न उपस्थित केले.
सुशीला गजभिये या लेखिकेने मर्मभेदी हल्ला करत सुशिक्षितांना याची जाणीव करून दिली. अत्याचाराला न दबणारी अस्पृश्यांची मने “विसाव्याचे शिवार’ या कथेत शीला पवार यांनी रेखाटली. अत्याचार, अठराविश्व दारिद्य्र याला न जुमानता स्वाभिमानी अस्पृश्य स्त्री “स्वावलंबी सरू’ या कथेतील द्रौपदी शेजवळ यांनी रंगवली. सुशीला गजभिये (दुरचे दिवे), संजीवनी कांबळे (कलंक), प्रभावती भालेराव (अन्यायाविरुद्ध झगडणारा बंडखोर), वत्सला गोरे (महिलांनी संघटित व्हा), धोंडाबाई मोरे (भगवंत आणि धनिया) वगैरे यांनी कथा लेखन केले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमनामुळे झालेले बदल वर्णन करणारी “क्रांतिदीप’ ही कथा अनसुया केदारे या मुलीने लिहिली. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन जागृत मातेने मुलांसाठी कसे वागले पाहिजे हे वर्णन अनसुया कांबळेंनी “डॉ. आंबेडकर आणि अस्पृश्यता’ या शिर्षकाखाली लेख लिहिला. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिल्यानंतरचा अनुभव नलिनी साळवे यांनी “जागृत ज्योत’ या लेखात लिहिला.
त्या म्हणतात, “ते पहा आलाच आमचा परमेश्वर. त्याला भेटताना फाटक्या लक्तरातून वरून काळी दिसणारी पण आत प्रेमाचा झरा असलेली शरीरे आनंदाने भारावली, शरीरावरून वाहणाऱ्या घामात आनंदाश्रू मिळाले. किती गोडसंगम तो’. या वाक्यांतून लोकांच्या मनातील बाबासाहेबांबद्दलचे स्थान समजते. समाजशास्त्राच्या अभ्यासक मालिनी काशिनाथ जगताप यांनी “युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा लेख लिहिला. 1935च्या डॉ. आंबडेकरांच्या धर्मांतराच्या घोषणेनंतर कांताबाई नानाराव इंगळे या लेखिकेने
“मानवी जीवनात बौद्ध धर्माचे स्थान’ या लेखातून बौद्ध तत्त्वज्ञान सोप्या सरळ भाषेत लोकांपर्यंत पोहोचवले. डिसेंबर 1956 मध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर “बाबा किती घाई हो!’ हा श्रद्धांजलीपर लेख कलावतीबाई इनामदार यांनी लिहिला. वेदना, विद्रोह, अस्मितेसाठी दलित साहित्यात नवा प्रवाह सुरू होता. दलित स्त्री लेखिका, साहित्यिक खूप कमी आहेत. कुमुद पावडे “अंतःस्फोट’मधून उद्विग्न, संतापलेल्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करतात.
मल्लिका उमर शेख या “उद्ध्वस्त व्हायचंय मला’मध्ये दलित पॅंथरच्या चळवळीबद्दल, कार्यकर्त्यांबद्दल वास्तव लिहितात. नारायण सुर्वे, दया पवार, लक्ष्मण माने, बाबुराव बागुल, शंकरराव खरात, शरणकुमार लिंबाळे यांनी त्यांच्या लेखणीतून स्त्री सामर्थ्याबद्दल लेखन केले.
दलित साहित्यातून दलित स्त्रीची लढाऊवृत्ती, आक्रमक पवित्रा, बंडखोरी मुकाबल्याचे सामर्थ्य अनुभवयास मिळते.
दलितेतर साहित्यिकांनी चित्रित केलेली “अबला’ ही सबला आहे, याचे भान लेखकांनी ठेवले पाहिजे. योग्य संधी, मार्गदर्शन, सहकार्य मिळाल्यास अनेक नवोदित युवा वर्ग सध्या लिखाण या क्षेत्राकडे होकारार्थी नजरेने पाहताना दिसत आहे. मात्र प्रत्येक गोष्टीस मर्यादाही असतात. दलित साहित्याबद्दल विविध मत पाहायला मिळतात, जसे दलित वाङ्मय एकसुरी आहे त्यात तोचतोचपणा आहे.
अशी टीका होते, मात्र जर व्यवस्थेने वेदना काळजावर तशाच दिलेल्या असतील तर लेखनीतून येणारे अनुभव नावीन्यपूर्ण असावे, अशी अपेक्षा बाळगणे माणुसकीला सोडून होईल, असे वाटते. प्रमाणभाषेचे निकषसुद्धा न पाहता वेदना, समस्या, अनुभव यातून प्रेरित होऊन व्यवस्थेमध्ये बदल अपेक्षित आहे. ज्वलंत प्रश्नांचा हा लेखनातील वारसा महिला निरंतर चालू ठेवतील, याच कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन असेल.