मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार त्यांच्यावर बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता या कारणांकरिता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबतीतील फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यापूर्वीच, “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे.” असं स्पष्ट केलं होत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर गायब
अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सिंह यांची बदली गृहरक्षक दलाचे महानिदेशक म्हणुन करण्यात आली होती. त्यानंतर सुरवातीला वैद्यकीय रजेवर गेलेले परमबीर त्यानंतर कोणतीही सूचना न देता कार्यालयात ५ मेपासून अनुपस्थित होते. न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबरला फरार घोषित केले.
दरम्यान, सहा महिन्यांपासून अज्ञात वसंत असलेल्या परमबीर सिंह देशातून फरार झाले असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. २५ नोव्हेंबरला ते चंदीगड येथून विमानाने मुंबईत आले.