कामशेत – दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसात भिजल्याने पिंपळोली येथे 30, तर मळवंडी ढोरे येथे 15 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपालांचे मोठे नुकसान झाले. मावळ महसूल विभागाकडून या ठिकाणची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच नुकसानग्रस्त मेंढपालांना तात्काळ मदत देण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी सांगितले.
पिंपळोली गावातील मेंढपाल रमेश करे (वय 31) व भीमा नारायण करे (वय 35) यांच्या अवकाळी पावसाने व थंडीने गारठून 30 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर मळवंडी ढोरे येथील मेंढपाल पोपट चिंधू माने (वय 35), गजू बाळू याने (वय 45) व लक्ष्मण अप्पा कोळकर (वय 40, सर्व मूळ राहणार पारनेर, अहमदनगर) यांच्या एकूण 15 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
मावळात साधारणत: ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात जेजुरी, पारनेर (अहमदनगर) आदी ठिकाणाहू मेंढपाल मेंढ्यांना घेऊन चराईसाठी येत असतात. आणि पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा गावी जातात. दरम्यानच्या काळात हे मेंढपाल माळरानावर व शेतकऱ्यांच्या शेतात वाडा बसवून परिसरातील गावांमध्ये मेंढ्या चारत असतात. यावर्षी अवकाळी पावसाने व थंडीने या मेंढपालांचे मोठे नुकसान झाले.
मेंढ्यासह त्यांच्या जवळील अन्नधान्य, कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे भिजून नुकसान झाले. नुकसानग्रस्त मेंढपाल धनगरांचे स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनामे केले असून, त्यांना तात्काळ मदत देखील देण्यात येणार आहे.