एक डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय एचआयव्ही एड्स दिन मानला जातो. त्यानिमित्त…
एड्स आणि एचआयव्ही या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशिअन्सी सिंड्रोम. हा आजार एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस या विषाणूंमुळे होतो. म्हणून त्याला एचआयव्ही म्हटलं जातं. आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींवरच हा विषाणू हल्ला चढवतो. त्यामुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी कमी होऊ लागते आणि निरनिराळे आजार शरीरात सहज शिरकाव करू शकतात.
एचआयव्हीची बाधा झाली तरी लगेच एड्स होतो असं नाही. योग्य काळजी घेऊन एड्सचा धोका टाळता यायला हवा. कारण अद्यापही रामबाण म्हणावी अशी एड्स प्रतिबंधक लस बाजारात आलेली नाही. 2016च्या अहवालानुसार 36.7 दशलक्ष लोक सध्या एचआयव्ही बाधित आहेत.
खरं तर एड्सच्या दुप्पट लोक मलेरियानं मरतात. पण हा रोग लैंगिकतेशी जोडला गेल्यानं त्याविषयी जास्त चर्चा झाली. शिवाय हा तेव्हा नवीनच रोग असल्याने त्यासंबंधी गैरसमजही पुष्कळ. एड्स झालेल्या लोकांना समाजातून, कुटुंबातून बहिष्कृत केलं जाऊ लागलं. एड्सविषयी दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक परिषद भरवली जाते. त्यातल्या तेराव्या परिषदेचं घोषवाक्य होतं, “मौन सोडा.’ म्हणजेच संकोच न ठेवता, भीती न बाळगता, आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत हे सांगण्यास कचरू नका. बोला. ताबडतोब उपचार घ्या.
भारत सरकारने 1990मध्ये एड्सच्या प्रसाराला आटोक्यात ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील लोकशिक्षणाचा कार्यक्रम आखला. 1991 साली टीव्हीवरून जनजागृतीस सुरुवात झाली. तशा जाहिराती दिसू लागल्या. केवळ एकमेकांना स्पर्श केल्यानं हा रोग होऊ शकत नाही असं वारंवार सांगितलं जाऊ लागलं. पण एड्सची इतकी भीती जनसामान्यांच्या मनात बसली होती की, ऑफिसमधे, सोसायट्यांमधे, नातेवाईकात अशा लोकांना वाळीत टाकलं गेलं.
वस्तुतः एड्सचा प्रसार फक्त चार कारणांमुळे होत असतो. एक म्हणजे असुरक्षित शारीरिक संबंध. दुसरं, एचआयव्ही बाधित माणसाचं रक्त घेतलं तर इंजेक्शनच्या सुईद्वारे हा जंतू शरीरात प्रवेश करतो. तिसरं, एआयव्हीबाधित आईकडून गर्भातील मुलाला एड्स होण्याची शक्यता असते. चौथ्या कारणामुळे या रोगाचा सगळ्यात जास्त प्रसार झाला. एड्स असलेल्या व्यक्तीशी शरीरसंबंध.
अनेक बायकांना त्यांच्या नवऱ्यापासून ही लागण झाली. या रोगात पुष्कळ स्त्रिया बळी पडल्या. कारण मुळात स्त्रियांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा अडीचपटीनं जास्त असते. त्यातच नवऱ्यावर त्याचे कुटुंबीय जितक्या प्रेमाने उपचार करतात, तसे बायकांवर कोण करणार? कधीकधी तर इच्छा असली तरी आधीच एवढा पैसा पुरुषावर खर्च झाल्यावर बायकोवर खर्च करण्यासाठी पैसा उरायचाच नाही. या काळात देहविक्रीय करणाऱ्या स्त्रियांचे तर फार हाल झाले.
2005मधे या साथीने कहर केला. काही गोष्टी अनेकदा सांगूनही लोकांकडून पाळल्या जात नाहीत. लक्षात घेतल्या जात नाहीत. एसआयटी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. निरोधशिवाय जोडीदाराशी संबंध ठेवणं म्हणजे एसआयटी. या आजाराचं हे प्रमुख कारण आहे. डॉक्टरांकडे जाऊनच एचआयव्ही एड्सवर औषध घ्यावं लागतं. घरगुती उपचारांनी हा आजार बरा होत नाही.
हे माहीत असलं तरी माणसं थेट डॉक्टरांकडे जाण्यास कचरतात. वस्तुतः रक्त दिल्यानं, हाताच्या स्पर्शानं, डास चावण्यानं, शिंका, खोकला यामुळे, एकत्र राहिल्यानं किंवा एकमेकांसमवेत जेवल्याखाल्ल्यानं एचआयव्हीचा संसर्ग होत नाही. पण तरीही एकूणच या रोगाबद्दल एक विचित्र भीती मनामध्ये बसली होती व आजही आहे.
एड्स आटोक्यात ठेवण्यासाठी, एड्सबाधितांना मार्गदर्शन करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने एमएसएसी म्हणजे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल नावाची संस्था स्थापन केली आहे. स्वयंसेवी संस्थाही अनेक प्रकारे मदत करीत आहेत. अशा सेंटर्सचे मुख्य काम बाधितांना काउन्सेलिंग करण्याचे असते. कारण एड्ससाठी प्रचंड प्रमाणात गोळ्याऔषधे घ्यावी लागतात.
शिवाय पथ्यपाणी पुष्कळ. प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने सारखे काहीना काही दुखणेखुपणे चालूच राहते. त्यातून माणूस निराश होतो. अशा वेळी त्यांना धीर देणं, औषधं नियमितपणे घेण्यासाठी तयार करणं, त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करणं यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. शिकवलेले व्यायाम त्यांनी करावेत, त्यांच्या आवडत्या कामात त्यांनी मन रमवावं यासाठी प्रयत्न करावे लागतात.
एड्सचे इतके दुष्परिणाम सोसल्यावर तरी जगभर चाललेल्या मुलींच्या व्यापाराला विरोध करणं आवश्यक आहे. पण अद्यापही फक्त एक उपभोगाचं साधन म्हणूनच स्त्रियांकडे पाहिलं जातं आहे. स्त्रिया, मुली या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत याचं भान हवं. कामाच्या जागी होणाऱ्या लैंगिक शोषणातले धोके आधीच लक्षात घेऊन सावध राहायला हवं.
एड्सबाबत आणखी एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे अशा पेशन्टशी इतरांनी सतत संपर्क राखून संवाद ठेवायला हवा. त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात घेऊन जायला हवं. स्व-मदत गट तयार केल्याचाही फायदा होतो. स्वाइन फ्लू, एड्स, करोना असे भयंकर आजार येतच राहणार आहेत; आपण त्यातून काही शहाणपण शिकलो तरच मानवाला सुखी होण्याचा मार्ग सापडेल.
– माधुरी तळवलकर