काच, स्वप्ने आणि नाते जेव्हा तुटतात तेव्हा टोचू लागतात. एका अतिशय जवळच्या नातलगाच्या दुटप्पी वागण्याने त्यांच्या माझ्यात निर्माण झालेल्या दुराव्याने माझे हळवे मन दररोज कुरतडणाऱ्या घटनेचा हा मागोवा.
पुण्यात माझे एक नातेवाईक राहतात. नाते दूरचे असले तरी माझ्या आणि त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांची मने रेशीमधाग्यांनी घट्ट विणलेली होती. जवळजवळ प्रत्येक आठवड्यात एकदा तरी आमची भेट होत असे. फोनवर दररोजच बोलणे व्हायचे. आमची सुख-दु:खे आम्ही वाटून घ्यायचो.
चार वर्षांमागे मोबाइलवर त्यांचा मला मेसेज आला. आपल्याच समाजातील एक कुटुंब आहे. त्या कुटुंबात एकूण सात माणसे आहेत. पती, पत्नी आणि त्यांच्या पाच मुली असा कुटुंबाचा विस्तार असून हे कुटुंब एका पत्र्याच्या खोलीत राहात आहे. कुटुंबप्रमुख फुटपाथवर बसून घड्याळे दुरुस्त करतात. अगदीच तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांचे खूपच हाल होतात. सर्वात मोठी मुलगी बारावीत तर तिच्यापेक्षा लहान असलेली मुलगी दहावीत शिकत आहे. त्या दोघींची शाळेची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही काही मदत करू शकाल का? असा तो मेसेज होता.
मेसेज वाचून झाल्यावर मला माझे लहानपण नजरेसमोर तराळले. सन 1963 साली अकरावीच्या परीक्षेचा फॉर्म भरताना मला 21 रुपयांची गरज होती. लहान असताना घरच्या गरिबीमुळे माझ्या जन्मगावी मी पाव-बटर विकत असे. माझ्या वडिलांजवळ एवढी रक्कम नव्हती. त्यावेळी कराड येथील बापू पालकर नावाचे माणसाच्या रूपातील परमेश्वर माझ्यासाठी धावून आले होते. त्यांनी माझी फी भरली होती. अकरावी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यावर मला पुण्यात आयकर खात्यात लिपिकाची नोकरी मिळाली.
मेसेज वाचून झाल्यावर, बापूंचे उपकार आणि त्यांचे संस्कार आठवून मी मेसेज पाठविणाऱ्या नातलगाला फोन केला. मी असं करतो, दोघींपैकी एका मुलीचे पालकत्व मीच घेतो. किती पैसे लागणार आहेत? फीचा आकडा काय आहे? असे विचारल्यावर त्यांनी मोठ्या मुलीसाठी 13 हजार व लहान मुलीसाठी 11 हजार रुपये लागतील, असे उत्तर दिले.
लहान मुलीसाठी मी मदत करणार आहे, असे सांगून मी त्या मुलीच्या वडिलांना माझ्या घरी पाठवा अशी विनंती केली. दुसरे दिवशी ते कुटुंबप्रमुख माझ्या घरी आले. माझा त्यांचा परिचय नव्हता. मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेचे नाव त्यांनी मला सांगितले. तिच्या फीसाठी 11 हजार रुपयांची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. योगायोगाने त्या शाळेचे मुख्याध्यापक माझ्या ओळखीचे होते.
माझ्या कथांचे ते चाहते होते. मी त्यांना फोन लावला. मुलीला ते नावानिशी ओळखत होते. त्या मुलीची फी मी भरतो आहे हे त्यांना कळल्यावर ते आनंदून गेले. तुम्ही फी भरणार आहात तर मी माझ्या अधिकारात 2 हजार रुपये रक्कम कमी करतो. फक्त 9 हजार रुपयांचा चेक द्या असे त्यांनी मला सुचविले. चेक मुलीच्या वडिलांकडे देऊ का? असे मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, दोन दिवसांत मी स्वत: तुमच्याकडे येतो. माझ्याबरोबर शिक्षण क्षेत्रातील काही लोक असतील. त्यांच्या समक्ष व ती मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांच्या हस्ते तुम्ही चेक द्या.
दोन दिवसांनंतर मी माझ्या घरी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला. काही मान्यवरांच्या उपस्थितीत फीच्या रकमेचा चेक त्या विद्यार्थिनीच्या हस्ते मी मुख्याधापकांकडे सुपूर्त केला.
वरील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती मी त्या नातेवाईकांना केली होती. ज्या मुलीला मी मदत केली तिच्या वडिलांनाही त्यांच्याकडे प्रत्यक्ष पाठविले होते. परंतु ते आलेच नाहीत.
मी ज्यांच्यावर अविरत प्रेम करीत होतो, ज्या नातलगाने या कुटुंबाची माहिती पाठवून त्यांना मदत करण्याविषयी मला सुचविले होते ते कार्यक्रमासाठी अनुपस्थित का राहिले असावेत, हा प्रश्न मला अनेक दिवस भेडसावीत होता. एक दिवस मात्र मला या प्रश्नाचे उत्तर अचानकपणे मिळाले.
एके दिवशी माझे दुसरे नातेवाईक मला भेटल्यावर म्हणाले, त्या घड्याळ दुरुस्त करणाऱ्या कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांच्या मुलींच्या फीचे कारण सांगून त्या गृहस्थांनी एकंदर 63 हजार रुपये त्यांच्याकडून उकळले आहेत.
खरे गौडबंगाल काय आहे ते मला अजूनही ठाऊक नाही. माझ्यावर, माझ्या लेखनावर मनस्वी प्रेम करणारे नातलग असे करणारच नाहीत असे मला अजूनही वाटते. या सत्य घटनेवर आधारित “मदतनीस’ या नावाची एक लघुकथा मी लिहिली. ती प्रभातच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा वाचून मला त्या नातलगाकडून प्रतिक्रिया अपेक्षित होती. आजही त्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत मी आहे. “नाते जेव्हा तुटते तेव्हा जास्त टोचते’ हे अगदी खरे आहे.
बबन पोतदार
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक