नवी दिल्ली- करोनाविरोधातील लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, करोनाचे उच्चाटन होईपर्यंत बेफिकीर राहू नका, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी केले आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांनी नियमांना तिलांजली दिल्याच आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्व देण्यात येते आहे.
देशातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मांडविय यांनी गुरुवारी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बैठक घेतली. देशाचा करोनाविरोधी लढा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आणखी काही काळ सावधगिरी बाळगावी लागणार आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. सध्या 12 कोटी नागरिकांच्या दुसऱ्या लसमात्रेची वेळ झालेली आहे. या नागरिकांना दुसरी लसमात्रा घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन संपूर्ण लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करावी, असे ते म्हणाले. पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्याबाबत नागरिकांत उदासिनता दिसून येत आहे.
काही लोकांनी तर पहिला डोस घेण्याचेही टाळले आहे. अशा लोकांची संख्याही मोठी आहे. या लोकांचे लसीकरण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे लोकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.