नवी दिल्ली – राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली असून येत्या सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे. यामुळे ही बंदी उठवली जाते का? आणि पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचे खासकरून ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे. तमिळनाडूमधील “जल्लिकट्टू’ या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागांत बैलगाडी-बैलगाडा शर्यती होण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.
राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने 2017 साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. या बंदीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.