अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जगभरातील इस्लामबहुल देशातील दहशतवाद्यांना स्फुरण चढले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बांगलादेशमध्ये झालेला हिंदूंवरील हिंसाचार. या हिंसाचाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत.
पुर्वीचा पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशला 1971 झाली स्वातंत्र्य मिळाले ते भारतीय सैन्याच्या मदतीनेच. विशेष म्हणजे 1947 सालापर्यंत पूर्व पाकिस्तानमध्ये 35 टक्के हिंदू होते; पण 1971 साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत घसरले आणि सध्या बांगलादेशात 9 टक्के हिंदू आहेत.
ज्यावेळी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले आणि शेख मुजिबूर रेहमान पहिले अध्यक्ष आणि पंतप्रधान झाले, तेव्हा या देशाच्या घटनेमध्ये निधर्मीवाद, लोकशाही, समाजवाद आणि राष्ट्रवाद ही प्रमुख चार तत्त्वे होती. पण 1975 मध्ये शेख मुजिबूर रेहमान यांची लष्करी बंडामध्ये हत्या झाल्यानंतर या चार प्रमुख तत्त्वांची पायमल्ली होण्यास प्रारंभ झाला.
त्यामुळेच बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या वरील अत्याचारात वाढ होऊ लागली. 1988 झाली हुसेन मोहम्मद इर्शाद हे बांगलादेशचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तत्काळ बांगलादेश हा इस्लामी देश असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून बांगलादेशची ओळख इस्लामी राष्ट्र अशी झाली आहे. यानंतर या देशातील अल्पसंख्याक हिंदू आणि बौद्ध यांना तृतीय दर्जाचे नागरिक म्हणून पाहिले आणि वागवले जाऊ लागले.
शेख हसीना यांचा अपवाद वगळता शेख मुजिबूर रेहमान यांच्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले किंवा आपल्या राजकीय लाभासाठी मूलतत्त्ववाद्यांना अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यास मोकळीक दिली. धार्मिक छळ, जबरदस्तीने मालमत्ता ताब्यात घेणे, धर्मांतर, बलात्कार, अपहरण, खंडणी उकळणे इत्यादी अत्याचारामुळे बांगलादेशमधील हिंदू गांजून गेले आहेत.
गेल्या पाच दशकांमध्ये बांगलादेशी हिंदूंनी आपली सव्वीस लाख एकर जमीन गमावली आहे. त्याचप्रमाणे 1964 ते 2013 या कालावधीत 1 कोटी 13 लाख हिंदूंनी बांगलादेशातून भारतात आणि इतर देशांत स्थलांतर केलेले आहे, असे ढाका विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक अब्दुल बरकत यांनी आपल्या “डीप्रायव्हेशन ऑफ हिंदू मायनॉरिटी इन बांगलादेश ः लिव्हिंग वेस्टेड प्रॉपर्टी’ या पुस्तकात नमूद केले आहे.
ज्या बांगला अस्मितेसाठी बांगलादेशने लढा दिला तिथे आता अरेबिक आणि उर्दूचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. तब्लिघी जमात, देवबंदी, अहले हदीत, जमात-ए-इस्लामी अशा असंख्य मूलतत्त्ववादी संघटना बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार आणि धर्मांतर करण्यास अग्रेसर आहेत. शहादत वाहिनी ही दहशतवादी संघटना बांगलादेशी हिंदूंना भारतात पळून लावून त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.
हिंदू धर्मावर आग ओकणारा इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक हा जगात सर्वांत जास्त बांगलादेशमध्ये लोकप्रिय आहे. पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संघटना बांगलादेशी मूलतत्त्ववादी आणि दहशतवाद्यांना मदत करीत असते. बांगलादेश सध्या आपल्या स्वातंत्र्याचे 50 वे वर्ष साजरे करत आहे; पण या पाच दशकांत बांगलादेशमध्ये मूलतत्त्ववाद्यांकडून हजारो हिंदू मारले गेले. हा कलंक या देशाला लागलेला आहे.
या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवाच्या दरम्यान झालेला हिंसाचार हा गेल्या दहा वर्षांतील सर्वांत मोठा हिंसाचार आहे. या उत्सवाच्या दरम्यान कोमिला शहरातील एका दुर्गापूजा उत्सव मंडपात कुराणाची प्रत ठेवून अवमान करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर झळकल्यानंतर संपूर्ण बांगलादेशामध्ये हिंसाचारास प्रारंभ झाला. या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या शेकडो घरांना आणि मालमत्तांना आगी लावण्यात आल्या आणि काही हिंदू मृत्युमुखी पडले.
सुप्रसिद्ध इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला. या हिंसाचाराचे जगभर पडसाद उमटले. बांगलादेशमधील विविध वृत्तपत्रांनीही या हिंसाचाराबाबत सरकारला धारेवर धरले. यूनो, अमेरिका आणि इतर अनेक देशांनी या हिंसाचाराचा निषेध केला. बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही या हिंसाचाराचा निषेध केला. त्या म्हणाल्या, दुर्गापूजा उत्सव हा बांगलादेशमधील हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि मूलतत्त्ववाद्यांकडून या उत्सवाच्या दरम्यान हिंसाचार घडण्याची शक्यता असते, हे माहीत असूनसुद्धा दुर्गापूजा मंडपांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था का दिली गेली नाही?
त्या पुढे म्हणतात, “बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात विनाकारण मशिदी आणि मदरसे उभारले जात आहेत. या मदरशांमध्ये युवकांची हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध माथी भडकवण्याचे काम सुरू असते. तेव्हा बांगलादेश सरकारने या मदरशांमध्ये नेमके काय शिकवले जाते यावर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.’
या हिंसाचाराच्या मागे कुणाचा हात असावा आणि हेतू काय असावा याबद्दल अनेक तर्क वर्तवले गेले. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने या हिंसाचाराचा ठपका बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यावर ठेवला. 2023 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा हिंसाचार घडवून आणण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षांवर केला गेला. बांगलादेशची प्रतिमा मलिन करण्याचे हे कारस्थान आहे, असे बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी म्हटले.
तर पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने हा हिंसाचार घडवून आणला असावा असाही अंदाज आहे. कारण शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या इस्लामी देशात बऱ्याच प्रमाणात सुयोग्य कारभार करून देशाच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलेले आहे. त्याचप्रमाणे भारताशी या सरकारचे चांगले संबंध आहेत. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुतांश हिंदू शेख हसीना यांच्या अवामी लीगला भरघोस मतदान करतात. ही विरोधी पक्षांची पोटदुखी आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचेही शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत. पण बांगलादेशात हिंदूविरुद्ध हिंसाचार करण्यासाठी कारण लागतेच असे नाही. कारण नसतानाही हिंसाचार होतो.
या हिंसाचारप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तातडीने कारवाई करून पाचशेपेक्षा जास्त दंगलखोरांना अटक केली पण तेवढ्याने प्रश्न सुटणार नव्हता. या दुर्गापूजा मंडपामध्ये पवित्र कुराणाची प्रत कोणी व का ठेवली हा खरा प्रश्न होता. अखेर त्याची तड लागली. एक इस्लामी युवक कुराणाची प्रत दुर्गापूजा मंडपामध्ये ठेवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून दिसून आले आणि त्यावरून पोलिसांनी दोन युवकांना अटक केली. आता या युवकांनी हे कृत्य का केले याचे कारण उघड होईल.
पण हा एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे हे या घटनेवरून दिसून येते. जरी हा हिंसाचार झाला तरी बांगलादेशातील इतर राजवटींच्या मानाने शेख हसीना यांच्या राजवटीत हिंदू अल्पसंख्याक बऱ्याच प्रमाणात सुरक्षित आहेत, असे म्हणावे लागेल. कारण शेख हसीना यांचे सरकार गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करून त्यांना सजाही देते, असे दिसून आलेले आहे. हिंसाचार संपल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजधानी ढाक्यातील सुप्रसिद्ध ढाकेश्वरीदेवी मंदिराला भेट देऊन तेथे पूजाही केली आणि धार्मिक सलोख्याचा दाखला दिला. असे असले तरी बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांची झपाट्याने होत चाललेली घट आणि त्यांचे भवितव्य काय, हा मोठा चिंतेचा विषय आहे.
– प्रसाद वि. प्रभू