कतीच मंगेश पाडगावकर यांची एक छान कविता वाचनात आली.
दार उघड चिऊताई, दार उघड
अगं, दार असं लावून जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आणि आपलं मन आपणच खात बसशील?
हे फक्त चिऊताईबाबतीत नाही तर आपल्या बाबतीत सुद्धा आहे. अनेक गोष्टीत जगाचा राग येतो. पुढे-
अगं, फुलं जशी असतात तसे काटे असतात
आणि सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात
गुलाबाचे फूल सगळ्यांना आवडतं. पण त्याला काट्यांसकट स्वीकारावं लागतं. आयुष्यात सगळे रस्ते सरळ नसतात. म्हणजे सगळी माणसं सरळ भेटत नाहीत. पण जगावं लागतं. गाणाऱ्या मैना असतात, पांढरेशुभ्र बगळे असतात. मैना सुंदर गातात; पण लोकांचे लक्ष बगळ्याच्या पांढऱ्या रंगाकडे आणि मैनेच्या काळ्या रंगाकडे जातं. पण आपण जग बदलू शकत नाही.
चिऊताई कावळ्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील,
पण तरीही जगात वावरावे लागते
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं
गोष्टी मनाविरूद्ध घडत असल्या तरीही जगात वावरावे लागतं. आपल्या मनासारखं सदा सर्वदा घडत नाही म्हणून जे घडतं ते स्वीकारावे लागते.
दार उघड चिऊताई
अगं, सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं
आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं
प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद मिळेलच अशी खात्री नसते. आपण जीवापाड प्रेम करतो; पण समोरची व्यक्ती हिडीस फिडीस करते, तिरस्कार करते, टाळते, प्रेमाचा स्वीकार करत नाही. त्याचा त्रास होतो, खूप मानसिक त्रास होतो. पण सोडून द्यायचं. पुढे –
मोर सुंदर नाचतो, म्हणून आपण
का सुन्न व्हायचं
आणि कोकीळ सुरात गातो म्हणून आपण
का खिन्न व्हायचं,
तुलना करीत बसायचं नसतं गं
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं आपलं वेगळेपण असतं गं
किती छान! चांगला गायक सगळ्यांनाच होता येत नाही; पण म्हणून गाणं गायचं सोडून द्यायचं नसतं. कारण या जगात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. एकसारखा दुसरा नसतो. प्रत्येकात काहीतरी गुण असतात. फक्त ते ओळखून वाढवावे लागतात.
अगं, निराशेच्या पोकळीत काही सुद्धा
घडत नाही,
आणि आपलं दार बंद म्हणून कोणाचं
अडत नाही
आपणच मग आपला द्वेष करू लागतो
निराश व्यक्ती स्वत:त गुरफटलेली असते. जगापासून दूर जाते. मुख्य म्हणजे त्याचं इतरांना काही वाटत नाही. आपण कुठे गेलो नाही तर इतरांचं काही अडत नाही. कुणी बरोबर नसल्याने आपण आपल्यातले दोष शोधून स्वत:ला दोष देणं स्वत:चाच द्वेष करू लागतो. जरा बाहेरच्या मोकळ्या हवेत गेलं तर बरं वाटतं, निसर्ग आपल्याला खुणावत असतो, पक्षी मनोरंजन करत असतात. आपण स्वतःतून थोडं बाजूला होऊन याचा आनंद घ्यावा. कारण
सगळे टपलेले छळण्याला,
हे प्रत्येक वेळी खरं नसतं
हा जगाचा अलिखित नियम आहे. रोज सकाळी मोबाइल उघडला की, उपदेशाचे डोस पाजणाऱ्या अनेक पोस्ट बघायला मिळतात. त्या सगळ्यांना विचारावेसे वाटतं. यातलं तुम्ही स्वतः किती करता की फक्त फॉरवर्ड करण्यात धन्यता मानता.
चिऊताई, पहाटेच्या रंगात तुझं व्हाल
तुला शोधीत फुलपाखरू नाचत आलं,
पण तुला काहीच कळलं नाही
कारण तुझं दार बंद होतं
खरंच जगापासून लांब जाताना आपल्याकडे चालून आलेल्या संधीही जातात. निसर्ग रंगाची उधळण करत असतो; पण तो सोहळा नजरेपासून दूर जातो. यामुळे दाराशी आलेली संधी निघून जाते.
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल?
म्हणूनच, दार उघड चिऊताई
ही चिऊताई आपल्याला खूप काही शिकवून जाते, हो ना! व्यक्तिमत्त्व विकासाचे रकानेच्या रकाने भरून लिहिण्यापेक्षा थोडक्यात सांगितले आहे.
डॉ. नीलम ताटके