नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या एका विधानाने सध्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण केला आहे. त्यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल असतानाच एक किस्सा सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये त्यांच्या कारकिर्दीत अंबानी, आरएसएस संबंधित एका व्यक्तीने दोन फाईली मंजूर करण्यासाठी ३०० कोटींची ऑफर दिली होती. परंतु ही ऑफर मी धुडकावून लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या निर्णयाचे समर्थन करत भ्रष्टाचारावर तडजोड करण्याची गरज नाही असे सांगितले असल्याचा दावा मलिक यांनी केला.
सत्यपाल मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचे मलिक समर्थन करतात. पदाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात उभं राहण्याची तयारीही मलिक यांनी दाखवली. मलिक राजस्थानच्या झुंझनूत एका कार्यक्रमात बोलत होते.
तेव्हा ते म्हणाले की, काश्मीरात गेल्यानंतर माझ्यासमोर दोन फाईली मंजुरीसाठी आल्या होत्या. एक अंबानी आणि दुसरी आरएसएस संबंधित व्यक्तीच्या होत्या. जे मेहबूबा मुफ्तीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. हे गृहस्थ जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी होते.
दोन्ही विभागाच्या सचिवांनी मला सांगितले होते की, दोन्ही फाईली बेकायदेशीर कामाशी निगडीत असल्याने त्या मंजूर करू नये. तुम्हाला प्रत्येक फाईल मंजुर करण्यासाठी १५०-१५० कोटी मिळतील. परंतु मी त्यांना म्हटलं, ५ जोडी कुर्ता-पायजमा घेऊन आलो होतो आणि केवळ तेच परत घेऊन जाणार आहे. सध्या त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलिक यांनी दोन्ही फाईलींबाबत विस्तारात सांगितलं नसलं तरी ते स्पष्टपणे सरकारी कर्मचारी, निवृत्तीधारक आणि मान्यता प्राप्त पत्रकारांच्या एका सामुहिक आरोग्य विमा पॉलिसी योजना लागू करण्याच्या फाईलचा उल्लेख करत होते. ज्यासाठी सरकारने अनिल अंबानी यांची रिलायन्स समूहच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्ससोबत करार केला होता.