मुंबई – जामीनासाठी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पैसे भरू न शकणाऱ्या महिलांना कारागृहातून सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुक्ता योजना आणण्याचे ठरवले आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की या योजनेत छोट्या गुन्ह्यांसाठी बराच काळ कारागृहात राहाव्या लागलेल्या महिलांना मुक्त केले जाईल. त्यातून कारागृहावरील कैद्यांचा बोजाही कमी होईल.
अशा छोट्या स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे अनेक वर्ष या महिला कारागृहात अडकून पडल्या आहेत. त्यांना जामीनासाठीचे पैसेही भरता न आल्याने तेथे अडकून पडलेल्या महिलांची संख्याही मोठी आहे. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना दिला जाऊ शकतो याचा आढावा कारागृहांमार्फत घेतला जाणार आहे.
त्यांच्या बाबतीत कायद्याची प्रक्रिया पुर्ण करून त्यांना दिलासा दिला जाणार आहे असे मंत्र्यांनी सांगितले. आपण स्वत: विविध कारागृहांमध्ये जाऊन अशा महिला कैद्यांची माहिती घेणार आहोत असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले. कारागृहातून सुटलेल्या महिलांना जर स्वत:चे घर नसेल तर अशा महिलांना सरकारी योजनांतून आश्रय देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.