पुणे – शहरात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. यात प्रामुख्याने येरवडा तसेच धानोरीत पूरस्थिती उद्भवली. शहराच्या इतर भागांतही पाणी तुंबल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, सर्वाधिक तक्रारी भाजपच्या नगरसेवकांनीच केल्या. नालेसफाई आणि अन्य कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे प्रशासन सांगत आहे. दुसऱ्या बाजूला नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीमुळे खरंच नालेसफाईची कामे झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यसभा सुरू होताच, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी येरवडा तसेच नगररस्ता परिसरात उद्भवलेल्या पूरस्थितीवरून प्रशासनाच्या कारभाराचा पाढा वाचला. आमदार सुनील टिंगरे यांनी थेट बांधकाम विभागाच्या कामजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत धानोरी भागात मोठया प्रमाणात नाले बुजविण्यात तसेच वळविण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर नगरसेवक आदित्य माळवे, अजय खेडेकर, आनंद रिठे, हरीदास चरवड, दिलीप वेडेपाटील, सचिन दोडके, गणेश ढोरे, योगेश ससाणे, वसंत मोरे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ऐश्वर्या जाधव, अश्विनी लांडगे, सरस्वती शेंडगे, उज्ज्वला जंगले, स्मिता कोंढरे, प्रिया गदादे, यांनी प्रभागातील नालेसफाई तसेच पावसाच्या पाण्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचा यावेळी पाढाच वाचला.
तर विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल, यांनी दरवर्षीच पावसाळयात शहरात या समस्या उद्भवतात, प्रशासन नालेसफाईचे दावे करते, मात्र, प्रत्यक्षात केवळ खर्च केला जातो. त्यापुढे काहीच होत नाही. त्यामुळे आणखी किती वर्षे याच विषयावर आपण चर्चा करायची? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
महापालिका प्रशासन म्हणते, “पाऊस जास्त’
नगरसेवकांच्या टीकेनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत खुलासा केला. “लोहगाव विमाननगर, वानवडी या परिसरात दीड तासांत 75 मिलीमीटर पाऊस पडला. नाल्याची व ड्रेनेज लाइनच्या क्षमतेपेक्षा अधिक पाऊस पडल्याने पाणी साचले. शहरात पाणी साचण्याची 366 ठिकाणे आहेत. त्यातील 185 ठिकाणी उपाययोजना केली आहे. अद्याप 100 ठिकाणे व समाविष्ट गावांमधील ठिकाणी अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. ड्रेनेज लाइन व पावसाळी लाइनची वहन क्षेमता वाढवण्याची कामे सुरू आहेत.
पुढील महिन्यापासून नगररस्ता परिसरातील कामे सुरू करून पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वहनक्षमता वाढल्यानंतर पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. नगरसेवकांनी सांगितलेल्या ठिकाणांची पाहणी करून कार्यवाही केली जाणार आहे.’
येरवडा तसेच नगररस्ता परिसरात ड्रेनेज लाइन, पावसाळी लाइनची कामे काय केली, हे सांगावे. प्रशासन प्रत्येक वर्षी त्याबाबत सूचना करूनही, पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत असल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे,
माजी उपमहापौर
धानोरी भागात तरतूद असूनही गेल्या पाच या भागात स्ट्रॉर्मवॉटर लाइन का टाकल्या जात नाहीत? सुमारे हजारभर घरात पाणी शिरले. अद्याप पंचनामे नाहीत. मदत नाही. दरवर्षी ही स्थिती उद्भवत असून नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. याला जबाबदार कोण?
– अनिल टिंगरे, नगरसेवक
गेली पंचवीस वर्षे आम्ही नाल्यासंदर्भात ऐकतो. काढण्यात आलेल्या निविदेमध्ये काय काय कामे झाली, याबाबत कधीच कोणी बोलत नाही. कोणामुळे नाळे वळाले, ओढ्यांमध्ये कोणी-कोणी अतिक्रमणे केली, हे पुणेकरांना माहिती आहे. प्रशासनाने कारणे शोधून कार्यवाही करणे गरजेचे आहे.
गणेश बिडकर, सभागृह नेते