मुंबई : उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच आरएसएस कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात वाढत जाणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर भाष्य केले. लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे.
एका छोट्या स्वार्थासाठी हे सर्व घडत होतं सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू कुटुंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासंबंधी, परंपरा आणि मूल्यांचं शिक्षण देत नव्हती असेही म्हटले आहे. “धर्मातर कसं काय होतं? आपल्या देशातील मुलं, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी, लग्न करणारे चुकीचे आहेत हा मुद्दा वेगळा आहे. पण आपण आपली मुलं तयार करत नाही,” असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
भाजपाशासित राज्यांमध्ये कथित ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्यात आला असतानाच मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. आरएसएसकडून असलेल्या दबावामुळेच हा कायदा आणण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मोहन भागवत यांनी यावेळी भारतीय कौटुंबिक मूल्यं आणि त्यांचं जतन करण्याबद्दलही सांगितलं. तसंच आरएसएसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच दिसतात हा मुद्दाही उपस्थित केला.
“हिंदू समाज संघटित करणे हाच आरएसएसचा मुख्य हेतू आहे. पण जेव्हा आम्ही आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत,” असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
मोहन भागवत यांनी यावेळी पालकांना आपली मुलं ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय पाहतात यासंबंधी काळजी घेण्याचंही आवाहन केलं. ते म्हणाले की, “ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पहायला मिळतं. माध्यमांमध्ये जे येतं ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांच्या व्यवस्थेसाठी काय चांगलं होईल या दृष्टीकोनातून नसतं. आपणच मुलांना घरात काय पहायला हवं आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे”.
दरम्यान, मोहन भागवत यांनी यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते असं सांगितलं. तसंच ही मूल्यं नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला.
“लोकांना आपलं गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवलं. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केलं. आपल्या देशातही हेच सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणं पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिलंत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल,” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.