बिलांच्या परताव्यासाठी समिती नेमण्याची कविता म्हेत्रे यांची मागणी
वडूज – करोना काळात खाजगी हॉस्पिटल्सनी शासकीय आदेश धाब्यावर बसवून करोना रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट केली आहे. करोना रुग्णांची बिले लाखोंच्या घरात आहेत. अवाजवी बिलांचे ऑडिट करून, नागरिकांना अतिरिक्त बिलांचा परतावा मिळण्यासाठी शासनाने समिती नेमावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव प्रा. कविता म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
करोना काळात खाजगी हॉस्पिटल्समधील 80 टक्के खाटांवर करोना रुग्णांसाठी दर नियंत्रित करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत; परंतु या नियमांना हरताळ फासून लाखो रुपयांची अतिरिक्त बिले रुग्णांकडून वसूल करण्यात आली आहेत. बऱ्याच रुग्णांनी जीव गमावला. अवाजवी बिलांमुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. करोनावरील उपचारांसाठी लोकांनी कर्जे काढून, जनावरे व दागिने विकून पैसे उभे केले आहेत.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने आणि लाखो रुपयांचे कर्ज झाल्याने विधवा दुहेरी संकटात सापडल्या आहेत. शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्सवर तातडीने कारवाई करावी. शासनाने समिती नेमून खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करावे.बिलांच्या परताव्यांना गती द्यावी. खाजगी रुग्णालयांच्या बिलांच्या नियंत्रणाचा कायदा शासनाने करावा. या मागण्यांचे निवेदन प्रा. म्हेत्रे यांनी अजित पवार यांना खटावमध्ये
नुकतेच दिले.
अजितदादांच्या प्रशासनाला सूचना
करोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या “वात्सल्य’ अभियानाचा शासननिर्णय होऊन एक महिना लोटला, तरी जिल्ह्यात अद्याप तालुकास्तरीय वात्सल्य अभियान समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. याची गंभीर दखल घेऊन अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.