कोपर्डे हवेली – उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खेरी येथील शेतकऱ्यांना जीपने चिरडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत असून आमचे नेते शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार सोमवारी उद्या होणाऱ्या बंदमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या हत्याकांडाची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला. सह्याद्री साखर कारखाना स्थळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी लोकशाही व शांततेच्या मार्गाने रस्त्यावरून आंदोलन करीत असताना त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना न्याय देण्याऐवजी तथाकथित मंत्रीपुत्राने आंदोलनात बेफिकीर गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडण्याचा केलेला प्रयत्न तमाम जनतेने पाहिला आहे. या घटनेनंतर झालेल्या दंगलीत आठ जणांचा मृत्यू झाला. अशांना तातडीने अटक करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा लोकशाहीचा खूनच असून ही बाब चिंतेची आहे.” संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम आहे, असे सांगून पाटील म्हणाले, माजी कृषिमंत्री आमचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्यात आर्थिक परिवर्तन घडवले. परंतु, शेतकरी हिताविरोधात असलेले हिटलरशाही व गांधारीची भूमिका बजावत असलेले भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.
भांडवलदारांची पाठराखण करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. सत्तेचा गैरवापर करून संबंधित दोषींना पाठिशी घालण्याचा प्रकार लोकशाहीला घातक असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व भाजप प्रणित सरकारच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या निंदनीय कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, सुहास बोराटे, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव, जितेंद्र पवार, चंद्रकांत जाधव, सोमनाथ जाधव, अँड. चंद्रकांत कदम, काकासो गायकवाड, महिला राष्ट्रवादी आघाडीच्या सरचिटणीस सौ संगीता साळुंखे, शालन माळी, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष प्रभावती माळी, उपाध्यक्ष उषाताई जाधव सौ सुरेखा पाटील, सह्याद्रीचे संचालक माणिकराव पाटील, संजय थोरात, कांतीलाल पाटील, लहूराज जाधव, संभाजीराव गायकवाड, लालासाहेब पाटील, अॅड लालासाहेब मांडवेकर, यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.