कोल्हापूर (प्रतिनिधी) – शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची गजारुढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. दरम्यान ललिता पंचमीनिमित्त टेंबलाई येथील त्र्यंबोली टेकडीवर कोहळा फोडण्याचा विधी झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ललित पंचमी साजरी झाली.
ललित पंचमीनिमित्त त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी देवीच्या पालख्या सजविलेल्या रथातून टेकडीवर आणण्यात आल्या. महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, राजकुमार यशराजे छत्रपती यांचे आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये मंदिरातील धार्मिक विधी झाले.
यानंतर निधी श्रीकांत गुरव या कुमारिकेच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी झाला. कोहळा मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. धार्मिक विधी, पूजा झाल्यानंतर त्र्यंबोली देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले.
दरम्यान करवीर निवासिनी अंबाबाईची ललिता पंचमीला गजारुढ अंबारीतील पूजा बांधली आहे. श्रीपूजक अरुण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर,श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली.