नवी दिल्ली – कोळसा टंचाईमुळे अनेक राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज केंद्र सरकारने याबाबत मोठा दिलासा दिला असून कोळसा टंचाईची समस्या पुढील काही दिवसांमध्ये सोडवण्यात येईल असं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोळशाच्या किमती वाढल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
काही राज्यांकडे कोळशाचा साठा अवघे काही दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने वीज निर्मिती ठप्प पडू शकते. वीज निर्मिती प्रक्रिया सुरळीत ठेवायची असल्यास कोळशाचा पुरवठा पूर्वपदावर येणं महत्वाचं आहे. हे संकट अधिक गडद होत असल्याने आता केंद्रीय ऊर्जा मंत्रालय सक्रिय झालं आहे. याबाबतची सविस्तर माहिती…
गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांनी ‘ब्लॅकआउट’बाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात, ‘ वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा पूर्ववत झाला नाही तर येत्या दोन दिवसात राजधानी दिल्लीला “ब्लॅकआउट” चा सामना करावा लागू शकतो.’ असा इशारा दिला आहे.
पंजाब येथील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई भासत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी ‘रोटेशनल लोडशेडिंग’ करण्यात येत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्लांटमध्ये कोळशाचा केवळ पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.
अशातच केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी रविवारी याबाबत भाष्य करताना, “कोळशाच्या कमतरतेमुळे अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. ही टंचाई गेल आणि टाटा यांच्यातील चुकीच्या संवादाचे फलित आहे. देशात चार दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आरक्षित आहे. आपल्याकडे पुरेशी वीज उपलब्ध आहे… आम्ही संपूर्ण देशाला वीज पुरवठा करत आहोत. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी मागणी कारवी त्यांना पुरवठा करण्यात येईल.” अशी माहिती दिली.
याबाबत पुढे बोलताना ऊर्जामंत्र्यांनी, “पावसाळ्यात पुरवठा कमी होतोच. खाणींमध्ये पावसाचे पाणी भरल्याने असे होते. वाढत्या अर्थव्यवस्थेसह विजेची मागणी देखील वाढते. मात्र ऑक्टोबरमध्ये, जसजशी मागणी कमी होत जाईल, तसतसा साठा पुन्हा वाढू लागेल. पूर्वी आमच्याकडे नोव्हेंबर ते जून पर्यंत 17 दिवसांचा कोळसा साठा असायचा.” असं देखील सांगितलं.
तत्पूर्वी, शनिवारी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबात माहिती देताना, कोळशाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ आणि या वर्षी झालेला मुसळधार पाऊस यामुळे देशात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांची तुलना केली तर सप्टेंबरमध्ये आणि विशेषत: ऑक्टोबरमध्ये कोळशाचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात गोष्टी ठीक होतील,” असं सांगितलं होत.