पुणे – मुंबईवगळता राज्यातील इतर महापालिकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आगामी निवडणुकीबाबत कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र, तूर्तास प्रभाग पद्धती रचनेबाबत कॉंग्रेस न्यायालयात जाणार नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पुण्यात स्पष्ट केले.
राज्य शासनाने तीन सदस्यांचा प्रभाग केल्यानंतर महाविकास आघाडीत सर्वप्रथम कॉंग्रेसने थेट प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखालील बैठक या निर्णयास विरोध केला होता. त्यानंतर हा निर्णय बदलण्यात यावा, या मागणीसाठी कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीकडूनही दोन अथवा एकचा प्रभाग असावा अशी भूमिका घेतली होती.
मात्र, तीनच्या प्रभागावर मुख्यमंत्री स्वत: ठाम असल्याने राज्य शासनाने आपला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत वाद असल्याची चर्चा होती. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रभाग कितीचाही झाला तरी, कॉंग्रेस महाविकास आघाडीत लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पटोले यांनीही या चर्चेला विराम दिला आहे.
पटोले म्हणाले, “सरकार आणि संघटन वेगळे असून त्याचा एकमेकांशी संबंध नाही. आगामी निवडणूक बाबत कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका जाहीर केली आहे. अधिक उमेदवारांचा प्रभाग असेल तर विकासाला अडचण येते. लोकप्रतिनिधींचा मतदार संपर्क तुटतो. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने कोणाचा फायदा होईल हे निकालानंतर समजेल.’