सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी; आश्वासनानंतर आंदोलन मागे
बोधेगाव (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी बालमटाकळी येथे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.दरम्यान, लेखी आश्वासनानंतर आंदोलन दोन तासांनी मागे घेण्यात आले.
शेवगाव तालुक्यात पूर्व भागातील बालमटाकळी-बोधेगाव परिसरात गेल्या दीड महिन्याभरात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत वेळोवेळी पाणी साचल्याने शेतातील खरीप हंगामातील कापूस, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी, आदी उभी पिके सडून जाऊन शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे. काहींच्या विहिरी ढासळल्या गेल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे. नुकसानग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करून मराठवाड्याच्या धर्तीवर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, ई-पीक पाहणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे. त्यामध्ये सवलत द्यावी, शेवगाव -गेवराई राज्यमार्ग, बालमटाकळी- कांबी जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल जोरदार अतिवृष्टीमुळे पाण्याने वाहून गेले आहे.
तसेच, परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात , अशा प्रमुख मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. बोधेगावचे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे, तलाठी बाबासाहेब अंधारे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे, बप्पासाहेब पारनेरे, राजेंद्र ढमढेरे, उपसरपंच तुषार वैद्य, मोहनराव देशमुख,संभाजी तिडके, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, नामदेव कसाळ,अशोक वैद्य, हरी फाटे, संजय वडते, हरिचंद्र घाडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंडलाधिकाऱ्यांची उशिरा इंट्री
आंदोलनच्या वेळी बोधेगावचे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे उशिरा आल्याने आंदोलक संतप्त होऊन अनेकांनी त्यांना मुख्यालयात येत नाहीत. जनतेची अडचण होत असल्याने त्यांना धारेवर धरले.