मैत्रिणीचा फोन आला होता. शांता शेळकेंची, सुभाष अवचटांनी लिहिलेली एक सुंदर पोस्ट तिची डिलीट झाली होती. माझ्याकडे नक्की असेल असे वाटलं तिला.. मग म्हणाली, प्लिज मला फॉरवर्ड कर ना…माझ्या हातून चुकून डिलीट झाली आहे.
तिचं चुकून पोस्ट डिलीट होण, माझ्या मनात मात्र फॉरवर्ड होऊन डिलीट होईना. मनात आलं डिलीट होण म्हणजे… नाहीस होणे, संपणं… कधी चुकून किंवा कधी मुद्दामहून मोबाइलच्या मर्यादेसाठी. आता व्हॉट्सऍप वापरताना ते एक कामच असतं. नको असलेले, जास्त झालेले मेसेजेस, फोटो डिलीट करणं.
मनात विचार आला आपल्या मनासाठी असा काही ऑप्शन असता तर किती बर झाले असते, नाही! जगणं सुसह्य झालं असतं का? कारण आपण नको असलेल्या, न आवडणाऱ्या, दुःख देणाऱ्या, मनाचा तोल बिघडवणाऱ्या किती फॉरवर्ड मनामध्ये साचून ठेवतो. नुसत्या साचवून ठेवत नाही तर वारंवार आठवत राहतो आणि दुःखी होऊन जगणं विसरतो.
खरं तर नको असलेलं खोडण्याची सवय आपल्याला लहानपणी लावतात. पाटीवर पहिला श्री गणेशा गिरवताना, ओल्या फडक्याच्या बोळ्याने आपण ते पुसलेलं असतंच की. नंतर पेन्सिल हातात आल्यावर, चुकलेले खोडरबराने खोडतोच की. नंतर शाईपेनासाठी खोडरबर वापरतो. नोकरीच्या काळात जेव्हा टायपिंगमध्ये चूक झाली तर कधी व्हाइटनर पण वापरलेलं असतं. पण मनात कोरलेल्या गोष्टी आपण खोडत नाही. विसरत नाही.
आताच्या या संगणकीय युगात मात्र सारंच बदललंय. आता चुकीचा शब्द, वाक्य काहीही पुसण्याची उत्तम सोय असते. कितीही वेळा चुकलं तरी बरोबर आणि योग्य लिहिता येतं.
मानवी मनाच्या भांडारात लहानपणापासूनच्या कितीतरी आठवणी साठलेल्या असतात.
काही आनंद देणाऱ्या प्रियजनांच्या तर वाढत्या वयात अनुभवांनी येणाऱ्या कितीतरी कडू आठवणीही असतात. या कडू आठवणी डिलीट करण्याची सोय हवी होती. आपल्याला हवं तेवढे जसं मोबाइलमध्ये ठेवतो तसं मनातही फक्त चांगले तेवढे ठेवण्याची सोय हवी होती. म्हणजे मधूनमधून त्या आठवणींनी मनावर जे मळभ येतं ना ते आलं नसतं.
सकारात्मक राहा, हा आजचा परवलीचा शब्द आहे. यामुळे मनातील आठवणी डिलीट तर होत नाहीत; पण पुसट नक्कीच होतात. टेक्नॉलॉजीच्या युगात संगणक आणि स्मार्टफोन यामुळे बऱ्याच नवीन शब्दांशी आपली मैत्री झाली.
काही वर्षांपूर्वी आपण याबाबत अनभिज्ञ होतो. काळाच्या ओघात आपण हे सारं स्वीकारलेलंही आहे. फक्त हे सारं वापरताना फॉरवर्ड, डिलीट, म्यूट, अनम्यूट, ब्लॉक करणे असे विविध पर्याय वापरताना चुकूनही कुणी जवळचं डिलीट होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे माणसं निदान सोशल मीडियावर तरी भेटत राहतील. कनेक्ट राहतील.
-आरती मोने