आळंदी – करोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत गणेश मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. रविवारच्या विसर्जन कालावधीत कोणीही गणेशाच्या मूर्ती विसर्जित करण्याकरिता इंद्रायणी नदीकडे आणू नयेत, असे आवाहन आळंदी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदीच्या घाटकमान तसेच वैतागेश्वर मंदिराजवळ व इतर ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात आल्याचे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. इंद्रायणी नदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपती यांच्यासाठी नागरिकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहे. तरी गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता आलेल्या गणेश भक्तांनी शांततेत आपापल्या मूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह न धरता संकलन केंद्रावर आपल्या मूर्ती जमा करायचे आहेत, असे आवाहन पोलीस प्रशासनासह आळंदी नगरपरिषदेने संबंधितांना केले आहे.
या कालावधीत सर्वांनी शांतता व सुव्यवस्था यांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. दोन्ही प्रशासनास सहकार्य करावे. शनिवार व रविवार या दोन दिवस इंद्रायणी नदी वर दोन्ही बाजूने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.