नगर (प्रतिनिधी) – येथे रोजच निर्भया मरत असते. आपल्या डोळ्यापुढे तिचा मृत्यू होत असतो, पण ती दुसऱ्याची पत्नी, बहीण किंवा आई असते… म्हणून आपण शांत असतो. आपण आपल्याला बदलेपर्यंत रोज नव्या निर्भया बलात्कार झेलत राहणार आहेत… हे कोणी नेता म्हणत नाही… हे निवेदन आहे नागरिकांनीच नागरिकांना दिलेले.
अलीकडेच पुण्यासह राज्यभर झालेल्या बलात्काराच्या घटना आणि साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिच्याबरोबर विकृत वर्तन केले. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाकडून वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्याजवळ मेणबत्ती पेटवून मूक शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी निवेदन वितरित करण्यात आले.
हे निवेदन सरकारला किंवा शासकीय यंत्रणेला उद्देशून नाही. आम्ही कोणाला काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. टीका, आरोप, सूचना सर्व आम्हाला निरर्थक वाटते म्हणून आम्ही नागरिक आपल्या सर्व नागरिकांना निवेदन देतो. मागील आठवड्यात मुंबईतील साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या पीडितेला दोन मुले असून तिचे कुटुंब आज उघड्यावर पडले आहे. यातील अन्य आरोपी अद्याप पसार आहेत.
मागील आठवड्यात पुणे येथे तेरा वर्षीय मुलीवर पंधरापेक्षा जास्त लोकांनी सलग चार दिवस बलात्कार केला. पुण्यातच एका रिक्षा चालकाने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. वसई येथे मतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. आता रोजच निर्भया बलात्कार झेलत आहेत.
आपण नागरिक काय करीत आहोत? पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेस आपण दोष देतो; परंतु जेव्हा आपल्या अवतीभवती घटना घडत असतात, तेंव्हा आपण त्यावर काय प्रतिसाद देतो, आपण स्वतःहून हस्तक्षेप देत नाही. त्वरित प्रतिकार करत नाही. कारण ती तेंव्हा दुसऱ्या कोणाची तरी पत्नी, मुलगी,बहीण किंवा आई असते.
आपण साक्षीदार, पंच, तक्रारदार व्हायला तयार नसतो. जोपर्यंत आपण बदलणार नाही तोपर्यँत काहीच बदलणार नाही. यावेळी गिरीश कुलकर्णी, शाम असावा,संजय गुगळे, हनीफ शेख, महेश सूर्यवंशी, पूजा पोपळघट, संगीत सानप, प्रियंका गायकवाड, शबाना शेख,अलीम पठाण, राहुल कांबळे, राहुल वैराळ, संतोष बेडेकर, प्रवीण कदम, प्रवीण मुत्याल, फिरोज पठाण, रुजू पांढरे इत्यादी उपस्थित होते.