टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या इतिहासातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना तब्बल 19 पदके मिळवली. या खेळाडूंकडे गुणवत्ता तर होतीच, पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सगळ्या अडचणींवर मात करत अखेर आपली गुणवत्ता सिद्ध केली व येत्या काळात देशात असेच अनेक खेळाडू तयार होतील याची साक्षही दिली.
यंदाच्या स्पर्धेत भारताचे 54 खेळाडूंचे आजवरचे सर्वात मोठे पथक सहभागी झाले होते. ही स्पर्धा संपली तेव्हा भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 8 रजत व 6 ब्रॉंझ अशी एकूण 19 पदके जमा होती. भारतासाठी ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक स्पर्धा ठरली. या स्पर्धेचे हेच विशेष आहे की स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आपले खेळाडू किमान पंधरा पदके जिंकतील असा विश्वास व्यक्त केला जात होता.
आपले खेळाडू चार पावले जास्त यशस्वी ठरले. या स्पर्धेपूर्वी भारताची दीपा मलिक हीच एकमेव पदक विजेती महिला खेळाडू होती. त्यात यंदा भर पडली. अवनी लेखराने दोन, भाविना पटेलने एक पदक जिंकून आता येत्या काळात या स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंमध्येही गुणवत्तेची कमी नाही याचीच साक्ष दिली.
यंदाची स्पर्धा भारताच्या पॅरालिम्पिक खेळांची कक्षा रुंदावणारी ठरली यात शंका नाही. कनुईंगसारख्या खेळात अंतिम फेरीत दाखल झालेली प्राची यादव, पॉवरलिफ्टर सकिना खातून, सिमरन शर्मा, भाग्यश्री जाधव, ज्योती बालियान आणि अरुणासिंग तंवर या खेळाडूंना पदक जिंकण्यात जरी अपयश आले असले तरीही त्यांनी केलेली कामगिरी निश्चितच दृष्टीआड करता येणार नाही. याच खेळाडूंकडून पुढील स्पर्धेत पदकाची अपेक्षा आहे आणि जरी यातील काही खेळाडू निवृत्त झाल्या तरीही त्यांच्याकडून प्रेरणा घेत नवोदितांकडून पॅरालिम्पिक मटेरियल म्हणून सरस कामगिरीची अपेक्षा करता येईल.
या स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताचे सात खेळाडू पात्र ठरले होते, त्यापैकी चौघांनी पदक मिळवले. तसे पाहिले तर हा खेळच या स्पर्धेत यंदापासून सहभागी करून घेण्यात आला होता, त्यामुळे आपल्या खेळाडूंचे यश जास्त महत्त्वाचे ठरते. देशाची सर्वात अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू पलक कोहलीला या स्पर्धेत अपेक्षेनुसार सरस कामगिरी करता आली नसली तरीही तिचे वय पाहता पुन्हा जेव्हा ही स्पर्धा होईल तेव्हा ती पदकविजेती असेल यात शंका नाही.
यंदाची स्पर्धा भारतीय खेळाडूंच्या आजवरच्या कामगिरीचा कळसाध्याय ठरली असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी ज्या संख्येने पदके जिंकली ते पाहता आपल्या खेळाडूंनीही जागतिक वर्चस्वाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशीही आपल्या खेळाडूंनी दोन पदकांना गवसणी घालताना स्पर्धेचा शेवटही गोड केला. भाविना पटेल, निशाद कुमार, अवनी लेखरा (दोन पदके), देवेंद्र झझारीया, सुंदरसिंह गुर्जर, योगेश कथुनिया, सुमीत अंतिल, सिंगराज अधाना (दोन पदके), मरियप्पन थंगवेलू, शरद कुमार, प्रवीण कुमार, हरविंदर सिंग, मनीष नरवाल, प्रमोद भगत, मनोज सरकार, सुहास यथीराज व कृष्णा नागर या पदक विजेत्यांनी यंदाची स्पर्धा गाजवली.
मूळ ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्यावर ही पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे ऑलिम्पिक खेळांकडे माध्यमांनीही जास्त लक्ष दिले. हे खरेतर भारतासारख्या देशात पहिल्यांदाच घडले आहे. गेल्या स्पर्धेत दीपा मलिकने पदक जिंकले तेव्हा आजच्या इतका गाजावाजा झाला नव्हता. इतकेच काय राजधानीत एका कार्यक्रमात तिचाच सत्कार होणार असलेल्या स्थळी गेली असताना तिलाच “तुम्ही कोण?’ म्हणून विचारण्यात आले होते. असो, किमान यावेळी तरी पॅरालिम्पिकपटूंची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली हे काय कमी आहे. 24 ऑगस्टपासून सुरू झालेली ही स्पर्धा 5 सप्टेंबरला संपली. टोकियोतील नॅशनल स्टेडियममध्ये मोठ्या थाटामाटात या स्पर्धेचे जसे उद्घाटन झाले तसेच सर्वांगसुंदर कार्यक्रमाने सांगताही झाली.
या स्पर्धेच्या पदक तालिकेकडे पाहिले तर चीनचेच वर्चस्व दिसते मात्र, ते देखील येत्या काळात भारतीय खेळाडू मोडून काढतील असा विश्वास आहे. मात्र, त्यासाठी भारतात या खेळांनाही लोकाश्रयासह राजाश्रयही मिळायला हवा. चीनने तब्ल 207 पदके मिळवताना जागतिक क्रीडाक्षेत्रावर असलेला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. दुसऱ्या स्थानावर ग्रेट र्टिेनचा संघ असून त्यांनी 124 पदके मिळवली आहेत.
अमेरिका 104 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रशिया पॅरालिम्पिक कमिटीला 118 पदकांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर 59 पदकांसह नेदरलॅंड पाचव्या स्थानावर आहे. रशियावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निर्बंध लादले असल्याने त्यांना देशाचा संघ म्हणून खेळता येत नसून रशिया पॅरालिम्पिक समिती या नावाने सहभागी व्हावे लागत आहे. हेच मूळ ऑलिम्पिक स्पर्धेतही घडले होते.
पदकांच्या शर्यतीत भारत 19 पदकांसह 24 व्या स्थानावर आला आहे. पॅरालिम्पिक खेळांची ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली असली तरीही येत्या काळात होत असलेल्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी असेच देदीप्यमान यश मिळवावे व त्याचा कळसाध्याय पुढील ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमध्येही घडवावा हीच अपेक्षा.
अमित डोंगरे