जम्मू – नोटाबंदी, जीएसटीमुळे लक्ष्मी घटली. नव्या कृषी कायद्यांमुळे दुर्गा शक्ती कमी झाली आणि विद्यालयात संघाची लोकं बसवून सरस्वतीची शक्ती कमी झाली. जे लोक स्वतःला मोठे हिंदू समजतात, त्यांनी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा अपमान केला आहे. ही लोकं देवीच्या मंदिरात डोकं टेकतात आणि त्यांची शक्ती कमी करण्याचा काम करतात, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.
राहुल गांधी हे दोनदिवसीय जम्मू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना त्रिकुटानगर येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय माता दी’ने केली.
राहुल गांधी म्हणाले, मी वैष्णो देवीचे दर्शन घेतले. मला असे वाटते की मी माझ्या घरीच आलो आहे.
काल मी मंदिरात गेलो होतो. तिथे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा देवी होती. दुर्गा या शब्दाचा अर्थ आहे रक्षण, लक्ष्मीचा अर्थ आहे लक्ष्य पूर्ण करा आणि सरस्वतीचा अर्थ आहे आम्हाला विद्या द्या. या तीन शक्तींमुळे देशाचा विकास होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मी काश्मिरी पंडित आहे. माझं कुटुंब काश्मिरी पंडित आहे. म्हणूनच मी जेव्हा जम्मू-काश्मीरला येतो तेव्हा मला असं वाटतं की मी घरीच आलो आहे, असे ते म्हणाले.
आज सकाळी काश्मिरी पंडितांचं शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी मला सांगितले की, कॉंग्रेसने त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. पण भाजपने काहीच केलं नाही. पण मी माझ्या काश्मिरी पंडित बांधवांना वचन देतो की, मी त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.
ते म्हणाले, माझ्या हृदयात जम्मू-काश्मीरला विशेष स्थान आहे. पण मला वेदनाही होतात. जम्मू-काश्मीरमध्ये बंधुभाव आहे. पण भाजप आणि आरएसएस ते बंधन तोडण्याचे प्रयत्न करत आहेत, असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.